मुंबई : तांत्रिक बिघाडानंतर सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला लागलेले तांत्रिक ग्रहण चौथ्या दिवशी कायम होते. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून दररोज साधारण दोन लाख विद्यार्थी अर्ज भरत आहेत. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संकेतस्थळ धीम्या गतीने चालणे, लॉगिन आयडी व पासवर्डचे संदेश न येणे, अनेक प्रयत्नांनंतर ते आल्यावर अन्य कोणी लॉगिन केल्याचा संदेश येणे, तसेच अर्जाचा दुसरा भाग सुरूच न होणे अशा अनेक समस्यांना विद्यार्थी व पालकांना सामोरे जावे लागत आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेला २६ मेपासून ऑनलाईन सुरूवात झाली. अर्ज नोंदणी करण्याच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू असल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र पुढील दिवसांमध्ये ही तांत्रिक समस्या दूर होण्याची अपेक्षा होती. मात्र दिवसेंदिवस त्यामध्ये अधिकच भर पडत आहे. सुरुवातील विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यात अडचणी येण्याबरोबरच महाविद्यालयांचे पसंतीक्रम दिसत नव्हते. मात्र आता विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेले लॉगिन आयडी व पासवर्ड मिळण्यातही अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डचा संदेश येत नसल्याने त्यांना अर्ज करताच येत नाही. वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांना संदेश आलाच, तर त्यांचे लॉगिन अन्यत्र सुरू असल्याचा संदेश येत आहे. ज्या विद्यार्थांचा पहिला भाग भरून होत आहे, अशा विद्यार्थ्यांना दुसरा भागच दाखवत नाही. या तांत्रिक अडचणीसाठी संकेतस्थळावर दिलेल्या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयत्न केला असता त्यावर लवकर प्रतिसादच मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक हताश झाले आहेत. यासंदर्भात शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्ष हतबल

अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी, मदत क्रमांकावर लवकर मिळत नसलेल्या प्रतिसादामुळे अनेक विद्यार्थी व पालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार घेऊन जात आहेत. तेथे तक्रार निवारण्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये दररोज साधारण ४० ते ५० तक्रारींची नोंद होत आहे. मात्र त्यांच्याकडे प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही अधिकार नसल्याने ते तक्रारी सोडविण्यासाठी हतबल आहेत. नोंद केलेल्या तक्रारींची माहिती ते पुण्यातील शिक्षण संचालकांच्या कार्यालयाला कळविण्याचे काम करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार दिवसांत अर्जामध्ये घट

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ मे रोजी २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. दुसऱ्या दिवशी यात घसरण झाली आणि २ लाख ७ हजार ६१२ विद्यार्थ्यांना अर्जनोंदणीत यश आले. तिसऱ्या दिवशी ही संख्या प्रचंड खालावली आणि १ लाख ४४ हजार ०५७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवले. चौथ्या दिवशी यात काहीशी सुधारणा झाली असून १ लाख ५१ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आतापर्यंत ७ लाख ६२ हजार २८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली, तरी त्यापैकी ५ लाख ८१ हजार ७७६ विद्यार्थ्यांचे नोंदणी शुल्क जमा झाले आहे. ५ लाख ३५ हजार ९०७ जणांनी आपले अर्ज अंतिम करून निश्चित केले आहेत. यामध्येही नियमित फेरीसाठी ४ लाख २८ हजार ८४२ अर्ज, इनहाऊस कोट्यासाठी १५ हजार ८१५ अर्ज, व्यवस्थापन कोट्यासाठी ७ हजार ६७२ अर्ज आणि अल्पसंख्यांक कोट्यासाठी १२ हजार ४१६ अर्ज करण्यात आले आहेत.