मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीने कलिना येथील एअर इंडियाच्या वसाहतीतील रिकाम्या वीस इमारती पाडल्या. मात्र, या इमारतीच्या संलग्न इमारतीला धोका निर्माण झाल्याने इमारतीमधील रहिवाशांनी त्याला प्रचंड विरोध केला. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाडकाम करण्यात आले. याबाबतची न्यायालयीन लढा सुरू असून तोपर्यंत पाडकाम करणे योग्य नसल्याचे म्हणणे रहिवाशांकडून मांडण्यात आले.

हेही वाचा >>> सहपोलीस आयुक्तांसह निकेत कौशिक, मधुकर पांडे, दिलीप सावंत यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळाजवळील एअर इंडिया वसाहतीमधील बुधवारी २० इमारती पाडल्या. या सर्व इमारती निर्जन व जीर्ण अवस्थेत होत्या. या इमारती पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या संबंधित विभागाकडून घेण्यात आल्या होत्या. एअर इंडियाच्या पीएसयू मालमत्ता होल्डिंग कंपनी एआयएएचएलने हे हस्तांतरित केले आहे. विमानतळाच्या जमिनीच्या सर्वसमावेशक पुनर्विकास योजनेचा एक भाग म्हणून हे केले आहे. रहिवासी राहात असलेल्या वसाहतींमधील उर्वरित ८० हून अधिक इमारतींवर सध्या कोणतीही कारवाई केलेली नाही. हे सर्व कायद्याचे पालन करून करण्यात आल्याचे म्हटले आहे. हा पुनर्विकास उपक्रम सध्याच्या प्रवासी सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी विमानतळाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे मुंबईच्या विकासाला आणि प्रगतीला चालना मिळेल.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलिना परिसरात १९५० साली दोन शाळा, एक सहकारी दुकान, मैदान आणि १,८०० कर्मचारी निवास्थाने असलेली वसाहत बांधण्यात आली. यात १८४ एकर जमिनीवर ही वसाहत आहे. पुनर्विकासाच्या विरोधात नसून, कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून दूर करणे गैरसोयीचे आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होण्याआधी किंवा कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याआधी पाडकाम करणे चुकीचे आहे. याबाबत न्यायालयीन लडाई सुरू आहे. मात्र, त्याआधीच पाडकाम करण्यात आले, असे एअर इंडिया कॉलनी बचाओ समितीचे महासचिव एमपी देसाई यांनी सांगितले.