घाईगडबडीच्या वेळी मुंबईकरांचा प्रवास सुखाचा करणाऱ्या टॅक्सीचालकांसाठी मुंबईत तब्बल २७५ विनाशुल्क टॅक्सीस्टॅन्ड उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच स्थानिक रहिवाशांच्या गाडय़ांचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘रहिवासी वाहनतळ योजना’ राबविण्याचाही पालिकेचा विचार आहे.
रस्त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने वाहने उभी राहवीत आणि वाहतुकीमधील अडथळा दूर व्हावा, तसेच व्यापारी क्षेत्रात खासगी वाहनांना प्रतिबंध व्हावा यासाठी पालिकेने सशुल्क वाहनतळ योजना सुरू केली. मात्र नागरिकांवर आर्थिक बोजा पडेल हे कारण पुढे करून राजकारण्यांनी वाहनतळांवरील शुल्क वाढीला अडथळा निर्माण करत पालिकेचा महसूल बुडविण्याचे काम केले. सुधार समितीच्या अलिकडेच झालेल्या बैठकीतही शुल्कवाढीचा प्रस्ताव रोखून धरण्यात आला. गटनेत्यांच्या बैठकीतही या विषयावर ऊहापोह करण्यात आला.
प्रशासनाने वाहनतळ शुल्कवाढीचा सुधारित प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामध्ये मुंबईत २७५ वाहनतळे उभारण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी टॅक्सी उभी करण्यासाठी जागा मिळत नाहीत. त्यामुळे चालकांना आपल्या घराच्या आसपास टॅक्सी उभी करावी लागते. आता २७५ टॅक्सीस्टॅन्ड सुरू करुन चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात
येणार आहे.
दक्षिण मुंबईत अधिकृत ६४६ टॅक्सीस्टॅन्ड असून तेथे १,१५० टॅक्सी उभ्या केल्या जातात. मात्र रात्रीच्या वेळी हे स्टॅन्ड रिकामे असतात. या जागांचा वापर रात्री ऑटोरिक्षा आणि टॅक्सीस्टॅन्डसाठी करता येईल का याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. प्रचलित शुल्काच्या ५० ते ३० टक्के सवलत देऊन या वाहनतळांवर रिक्षा-टॅक्सी उभी करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार पालिका करीत आहे.