मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ योजनेतील ३०५ विजेत्यांची हक्काच्या घरांची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. पत्राचाळीतील सोडतीतील घरांचा समावेश असलेल्या इमारतीला अखेर म्हाडाकडून निवासी दाखला (ओसी) मिळाला आहे. आता आठवड्याभरात विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार असून आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हक्काच्या घरात राहायला जाण्याचे विजेत्यांचे स्वप्न आता अखेर पूर्ण होणार आहे.

मुंबई मंडळाकडून वादग्रस्त पत्राचाळ प्रकल्पातील अपूर्ण ३०५ घरांचा समावेश तत्कालीन उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी २०२६ च्या सोडतीत केला. सोडत झाली, मात्र अपूर्ण घरांची कामे काही सुरु झाली नाहीत आणि विजेत्यांची चिंता वाढली. अखेर राज्य सरकारने विकासकाकडून प्रकल्प काढून घेत तो म्हाडाकडे वर्ग केला त्यानंतर विजेत्यांना काहीसा दिलासा मिळाला. पण म्हाडाकडे प्रकल्प आल्यानंतरही प्रकल्पाचे काम सुरु होत नव्हते. बऱयाच पाठपुराव्यानंतर २०२२ मध्ये सोडतीतील घरांचे काम पूर्ण करण्यास मंडळाने सुरुवात केली. हे काम पूर्वीच पूर्ण होऊन आतापर्यंत ताबा देण्यास सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र त्यास अनेक कारणाने विलंब झाला. आता मात्र ३०५ विजेत्यांची प्रतीक्षा संपली आहे.

हेही वाचा…पुणे वर्तुळाकार रस्ता: तीन टप्प्यासाठी आर्थिक निविदा खुल्या

पत्राचाळीतील ३०५ घरांचा समावेश असलेल्या इमारतींना निवासी दाखला प्राप्त करुन देण्यासंबंधीचा प्रस्ताव आठवड्याभरापूर्वी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास जयस्वाल यांनी मान्यता दिली असून पुढील कार्यवाही करत निवासी दाखला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. निवासी दाखला मिळाल्याने आता आठवड्याभरात विजेत्यांना ताबा देण्याचा कामाला पणन विभागाकडून सुरुवात करणे शक्य होईल, असेही अधिकाऱयांनी सांगितले. एकूणच निवासी दाखल्याचा प्रश्न निकाली निघाल्याने विजेत्यांची हक्काच्या घराची तब्बल आठ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता लवकरच त्यांना घरांचा ताबा देण्यात येईल.

हेही वाचा…म्हाडा बृहतसूचीसाठी मागविणार अर्ज; १५ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज प्रक्रिया; सोडतीद्वारे मूळ भाडेकरूंना घरांचे वितरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूळ भाडेकरूंनाही लवकरच घरांचा ताबा

पत्राचाळ पुनर्विकासातील ६७२ मूळ भाडेकरू २००८ पासून बेघर आहेत. विकासकाने २०१६ पासून त्यांना घरभाडेही देणे बंद केले होते. पण प्रकल्प म्हाडाकडे आल्यानंतर भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे. पुनर्वसित इमारतींची अर्धवट कामे पूर्ण करण्यास २०२२ मध्ये मुंबई मंडळाने सुरुवात केली. या इमारतींचा निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे या ६७२ मूळ भाडेकरूंचेही हक्काच्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात ६७२ घरांच्या वितरण कार्यक्रमाचा समावेश म्हाडाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एका मोठ्या सोहळ्यात या घरांचे वितरण होण्याची शक्यता आहे.