मुंबई : मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३५ टक्केच पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी जुलैच्या पंधरवडय़ापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. पावसाचे प्रमाण शहर आणि उपनगरातही कमी असून धरणक्षेत्रातही तुरळक पाऊस पडत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून केवळ ३२.५२ टक्के पाणी जमा झाले आहे. जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसांत पावसाचा म्हणावा तसा जोर नाही. मुंबईत दरवर्षी पावसाळय़ाच्या चार महिन्यांत सुमारे २५०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत १६ ते १८ दिवस पाऊस झाला असून महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रांच्या नोंदींनुसार आतापर्यंत शहर भागात ७६४ मिमी तर पूर्व उपनगरात ९२९ मिमी आणि पश्चिम उपनगरात ९९९ मिमी इतका, म्हणजे सरासरी ३५ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या पंधरावडय़ापर्यंत ११०० ते १४०० मिमी (५३ टक्के) पाऊस पडला होता. शहर आणि उपनगराप्रमाणेच धरणक्षेत्रातही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पाणीसाठय़ात पुरेशी वाढ झालेली नाही. सातही धरणांत मिळून सध्या ४ लाख ७० हजार ६२१ दशलक्ष लीटर पाणी जमा झाले आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ३२.५२ टक्के आहे. धरणक्षेत्रातही दररोज जेमतेम ५० मिमी पाऊस पडतो आहे. तर गेल्यावर्षी याच दिवशी सातही धरणात मिळून ११ लाख दशलक्ष लिटरपेक्षाही अधिक म्हणजेच ७८ टक्के पाणीसाठा होता. गेल्या तीन वर्षांतील साठा १६ जुलै २०२३ - ४,७०,६२१ १६ जुलै २०२२ - ११,३८,०९७ १६ जुलै २०२१ - २,४९,४६० (आकडे दशलक्ष लिटरमध्ये) कोणत्या धरणात किती पाणी? उर्ध्व वैतरणा ९.०७ टक्के मोडक सागर ५५.०९ टक्के तानसा ६०.५७ टक्के मध्य वैतरणा ४५.२० टक्के भातसा २५.७७ टक्के विहार ४८.१७ टक्के तुलसी ६९.२२ टक्के एकूण ३२.५२ टक्के