मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम एसटीच्या सेवांवरही झाला आहे. महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या दररोजच्या १ हजार १५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या अंशत: रद्द केल्या आहेत. महाराष्ट्राच्या विविध विभागांतून एसटी बसेस नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापुरातून निपाणी-बेळगावमार्गे जाणाऱ्या ५७२ फेऱ्यांपैकी ३१२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गडिहग्लज, चंदगड, आजरा, तळकोकण व गोव्याला जाणाऱ्या बस फेऱ्या निपाणीऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील कर्नाटक राज्यात जाणाऱ्या ६० फेऱ्यांपैकी २२ फेऱ्या आणि अन्य विभागांतील संवेदनशील मार्गावरील ४८ फेऱ्या रद्द केल्याची माहिती महामंडळाने दिली.