मुंबई : शहरातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार सरत्या शैक्षणिक वर्षांत ( २०२४-२५) मुंबई शहरातून तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. त्या सर्व मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांनी ४ हजार १७८ मुले तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ३७७ मुले गेल्यावर्षी शाळेत दाखल करण्यात आली.
बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षण कायद्यांतर्गत बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही दरवर्षी राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले निदर्शनास येतात. मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्ते, सिग्नल परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात. त्याचनुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये ६ ते १४ वयोगटातील तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुले विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे शोधण्यात आली.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शोधण्यात आलेल्या ३७७ मुलांपैकी ६ ते १० वयोगटातील ४६ मुले आणि ११ ते १४ वयोगटातील ३३१ शाळाबाह्य विद्यार्थी होते. मुंबई महानगरपालिकेकडून ४ हजार १७८ मुले शोधण्यात यश आले. त्यापैकी अनेक मुलांना पूर्वी शाळेत प्रवेश देण्यात आला होता. मात्र, त्यातील अनेक मुले शाळेत जात नव्हती. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले. अधून-मधून शाळेत येणारे विद्यार्थी, ज्यांची नोंदणी झाली नाही असे विद्यार्थी, काही विद्यार्थी हे गावाला जाऊन तेथील शाळेत शिक्षण घेत होते. मात्र त्यांनी मुंबईतील शाळेमधून त्यांचे नाव कमी केले नव्हते. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांचे पालक हे रोजंदारीसाठी इतरत्र भटकत असल्याने त्यांच्या मुलांना शाळेत जाताच येत नव्हते.
शिक्षण विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आल्यानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शोध मोहीम राबविण्यात येते. यामध्ये पालकांचे समुपदेश करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. मुले शाळेत आली तर काम कोण करणार, त्यांना खायाला कोण देणार, त्यांच्या शिक्षणाचा खर्च कोण उचलणार अशी अनेक कारणे पालकांकडून उपस्थित केली जातात. मात्र मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत असल्याने अखेर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात तयार होतात. – सायली सुर्वे, उपशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा, मुंबई महानगरपालिका
शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही दरवर्षी सर्वतोपरी प्रयत्न करतो. या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांच्या पालकांची समजूत काढण्याबरोबरच परिसरातील अनेक अडचणींचा सामना आमच्या शिक्षकांना करावे लागते. मात्र ते कोणतीही तक्रार न करता हे काम नियोजन पद्धतीने करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणणे शक्य होते. – संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई
शाळाबाह्य मुलांची आकडेवारी
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक – ३७७
मुंबई महानगरपालिका – ४१७८