मुंबई – व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या साई ॲग्रीम कॉर्पोरेशन या कंपनीच्या राहुल जैन याच्याविरोधात आणखी एक फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जैन यांनी कांदीवली येथील एका व्यापाऱ्याला शंभर टन माल न देता २६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. कांदिवली पोलिसांनी नुकतीच जैन याला अटक केली आहे.
तक्रारदार हार्दीक शहा हे कांदिवलीत राहतात. त्यांची बीडीएफ इंटरनॅशनल एलएलपी नावाची कंपनी आहे. ते जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम करतात. ३१ जुलै २०२४ रोजी शहा यांना एसएलबी इथेन नलॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून २ हजार मेट्रीक टन मक्याचे दाणे पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी शहा यांनी नागपूरच्या साई ॲग्रीम कॉर्पोरेशन या कंपनीशी संपर्क साधला होता. कंपनीचा मालक राहुल जैन याने २०० टन मक्याचे दाणे देण्याचे आश्वासन दिले. हा करार ५२ लाखांना ठरला होता. त्यानुसार हार्दीक शहा यांनी जैन याला पहिल्या शंभर टनासाठी २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत २७ लाख २६ हजार रुपये दिले. जैन यांनी तक्रारदार शहा यांना १०० टन मक्याचे दाणे पुरवले. त्यामुळे शहा यांचा जैन यांच्यावर विश्वास बसला होता.
त्यामुळे पुढील शंभर टन मालासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शहा यांनी जैन याला २७ लाख ७९ हजार रुपये दिले. मात्र जैन याने ठरल्यानुसार माल न देता टाळाटाळ केली. विविध कारणे देत तो शहा यांना टाळू लागला. या काळात हार्दीक शहा यांना धनादेश देऊन वेळ मारून नेली. पंरतु ते धनादेश देखील वटले नाहीत. २४ ऑगस्ट २०२०४ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २६ लाख ७९ हजार रुपये घेऊन माल पुरवला नाही आणि फसवणूक केली. दरम्यान, राहुल जैन याच्या विरोधात अन्य पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शहा यांना मिळाली. त्यामुळे शहा यांनी त कांदिवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
राहुल जैन विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच त्याला अटक करण्यात आले. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जैन याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.आरोपी जैन याने अनेक व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. त्याची कसून चौकशी होणे आवश्यक आहे असे तक्रारदार हार्दीक शहा यांनी सांगितले.