Aditya Thackeray on Mumbai Flood : शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत मुसळधार पावसामुळे ज्या-ज्या ठिकाणी पाणी तुंबलंय त्या भागांची पाहणी केली. त्यांनी वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाची पाहणी केली. या स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी व राडारोडा साचला आहे. त्यांनी हिंदमाता परिसराला देखील भेट दिली. त्यानंतर आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मुंबईच्या स्थितीवरून पालिका प्रशासन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेना (ठाकरे) आमदार म्हणाले, “या वर्षातला हा काही पहिला पाऊस नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस झाला होता तेव्हा साकीनाक्याची स्थिती बिकट झाली होती. गेल्या आठवड्यात थोड्याशा पावसाने अंधेरी सबवे भरून गेला होता. आज मुंबईत तिसऱ्यांदा पाऊस पडतोय आणि जागोजागी पाणी तुंबलं आहे. आम्ही दोन महिन्यांपासून सांगत आहोत की पावसाळा तोंडावर आहे, मात्र अद्याप नालेसफाई झालेली नाही. मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व बैठका झालेल्या नाहीत. परंतु, पालिका प्रशासन व राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. मुंबईकर भाजपाच्या निष्क्रीय कारभाराचा सामना करत आहेत. भाजपाला मुंबईचा इतका द्वेष का आहे?”

आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील पूरजन्य स्थितीवरून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती. २५ वर्षे मुंबईवर शिवसेनेची (ठाकरे) सत्ता असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी शेलार यांच्याबद्दल काही बोलणार नही. कारण त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्यांना सरकारने बाजूला ठेवल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत. आम्ही मुंबई महापालिकेत सत्तेवर होतो. परंतु, भाजपा देखील आमच्याबरोबर होती. अनेक समित्यांवर त्यांचे लोक होते. अनेक समित्यांचे अध्यक्षपद भाजपाकडे होतं. ११ वर्षांपासून राज्यात व केंद्रात ते सत्तेवर आहेत. त्यांच्यामुळेच मुंबईत ही गंभीर स्थिती उद्भवली आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे म्हणाले, “सध्या मुंबई महापालिकेवर महापौर नाहीत, नगरसेवक नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय व नगरविकास खात्याच्या कार्यालयातून मुंबई महापालिकेचा कारभार चालतो. सत्ताधारी केवळ लाडक्या कंत्राटदारांबरोबर बैठका घेतात. मात्र, कुठल्याही उपाययोजना राबवत नाहीत. खड्डेमुक्त मुंबईचा दावा करणाऱ्यांनी केवळ स्वतःच्या खिशातले खड्डे बुझवले. आमचं सरकार असताना अशी गंभीर स्थिती उद्भवली नव्हती”.