Aditya Thackeray on Eknath Shinde & Mumbai flood : शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी मुंबईत मुसळधार पावसामुळे ज्या-ज्या ठिकाणी पाणी तुंबलंय त्या भागांची पाहणी केली. तसेच मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकात (भुयारी) पावसाचं पाणी साचलं आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्यासारखं वाटत होतं. स्थानकात बराच राडारोडा देखील दिसत आहे. अशातच प्रशासनाने तातडीने हे स्थानक बंद केलं. कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही असं जाहीर करून टाकलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या मेट्रो स्थानकाला भेट दिली. पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मुंबईच्या स्थितीवरून पालिका प्रशासन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

“स्वतःला इन्फ्रा मॅन असं म्हणवून घेणारे, व्हिजनरी म्हणणारे, ग्रीन कार्पेट अंथरून नालेसफाईची पाहणी करणारे कुठे आहेत?” असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, “पालिकेचा खाल्लेला पैसा माजी नगरसेवकांना फोडण्यात, पदाधिकारी विकत घेण्यासाठी वापरला जात आहे. हा मुंबईकरांचा पैसा आहे”.

“पालिकेने वरळी मेट्रो स्थानकात आणीबाणी लावली आहे”

आदित्य ठाकरे म्हणाले, “दोन आठवड्यांपूर्वी वरळीतील भुयारी मेट्रोच्या स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र आज त्या स्थानकाची अवस्था बघा. आपल्याला आत जाऊ दिलं जात नाही. कारण आत काय झालंय, किती नुकसान झालंय ते त्यांना आपल्याला पाहू द्यायचं नाही. पालिकेने आणीबाणी लावली आहे. आपल्याला बाहेर तिथे बराच राडारोडा दिसतोय. ही मेट्रो वापरणं किती धोकादायक आहे ते दिसतंय. आतमध्ये काही कोसळलं आहे का ते त्यांनी सांगायला हवं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईकर या भाजपावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही : आदित्य ठाकरे

शिवसेना (ठाकरे) आमदार म्हणाले, “मुंबईच्या हिंदमाता परिसरात नेहमी पूर येतो. मात्र, आम्ही २०२२ मध्ये हा परिसर फ्लड फ्री (पूर मुक्त) केला होता. आज तिथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. आम्ही त्यावेळी या भागात पूर नियंत्रण योजना राबवली होती. आता मात्र हिंदमाता परिसर तुंबला आहे. मुंबईतील रस्ते खचले आहेत. भाजपाची केंद्रात व राज्यात ११ वर्षांपासून सत्ता आहे. सर्व यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालय व नगरविकास खात्याच्या कार्यालयातून चालते. मात्र ही कार्यालये व यंत्रणा किती भ्रष्ट आहे ते आजच्या पावसाने दाखवून दिलं आहे. मुंबईकर या भाजपावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही”.