मुंबई : तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उतीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात येतो. राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) राबविण्यात येत असून, लवकरच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांतर्गत पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी प्रत्येक कृषी महाविद्यालयातील जागांच्या १० टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग सोपा होणार आहे. या प्रवेशसाठी खुल्या प्रवर्गासाठी किमान ६.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह (सीजीपीए) उत्तीर्ण असणे आवश्यक असते. कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.