मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत ४० प्राणी पक्षी दगावल्याचे उघडकीस आल्यानंतर वृद्धत्व, प्राणी-पक्ष्यांमधील झटापटी, अवयव निकामी झाल्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे मृत्यू झाले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात २०२२-२३ या कालावधीत विविध जातीच्या ४० प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे वार्षिक अहवालातून उघड झाले आहे. हा अहवाल केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण (सीझेडए)ने प्रकाशित केला आहे. अनेक प्राणी हे ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे, श्वासोच्छवासास अडथळा झाल्यामुळे, शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे दगावल्याची कारणे दिली आहेत.

हेही वाचा >>> वहीमध्ये लिहिल्याने लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड; २१ वर्षीय तरूणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत प्राण्यांमध्ये ठिपके असलेले हरीण, बार्किंग डिअर, इमूल, मकाऊ पोपट, कासव यांचा समावेश होता. दरम्यान, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्राणी-पक्ष्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जाते. जे प्राणी-पक्षी आजारी आढळतात त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. उपचारादरम्यान प्राण्याचा मृत्यू झाला किंवा कुठल्याही प्रकारची आजारपाणाची लक्षणे नसतानाही अचानक मृत्यू झाला तर संबंधित प्राणी-पक्ष्याचे शवविच्छेदन केले जाते. यातील बहुसंख्य प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू हा अंतर्गत अवयव निकामी होणे, अस्तित्व राखण्यासाठी दोन प्राणी वा पक्ष्यांमध्ये झालेल्या झटापटी, वृद्धापकाळ आदी कारणांमुळे होत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राणी-पक्ष्यांचा शवविच्छेदनाच्या अहवालात प्रथमदर्शनी हृदय, फुप्फुस, मेंदू, किडनी, यकृत इत्यादी अवयवांची तपासणी केली जाते. त्यावरून मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जातो. ज्यामध्ये मुख्यतः वृद्धापकाळ, प्राणी-पक्ष्यांमधली झटापटी, त्यातून होणाऱ्या जखमा, अतिरिक्त रक्तस्त्राव, फुप्फुस-यकृत-मूत्रपिंडाचा आजार, कर्करोग, गर्भाशयाचे आजार आणि ताण-तणाव अशा अनेक बाबींचा समावेश असतो. फुप्फुस निकामी होणे किंवा एकापेक्षा जास्त अवयव संसर्गामुळे किंवा वृद्धापकाळामुळे देखील निकामी होतात. समूहाने राहणाऱ्या प्राण्यांमध्ये (हरीण, पक्षी, माकड इत्यादी) वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकदा झटापटी होतात. त्यात त्यांना इजा होते. अस्तित्व राखण्यासाठी किंवा क्षीण, वयस्कर, आजारी असलेल्या प्राण्यांना समुहातून वेगळे करण्यासाठी प्राण्यांमध्ये झटापटी होतात आणि यातूनच जखमी होवून बऱ्याचदा प्राण्यांचा मृत्यू होतो, असेही प्राणी संग्रहालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.