मरिन ड्राइव्हपेक्षा मोठी कि नारपट्टी विकसित होणार
संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट
मुं बई बंदर हे मुंबईतील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. जागतिक पातळीवर मुंबई बंदराला वेगळे स्थान आहे. मुंबई बंदराकडे मुंबईच्या आसपास एकूण ७४२ हेक्टर जमीन आहे. मुंबई शहराचा विचार करता हे प्रमाण जवळपास एकअष्टमांश आहे. २१ किमी परिसराचा किनारा असून, चार मरिन ड्राइव्ह एवढे त्याचे प्रमाण आहे. मुंबई बंदर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचे सरकारने ठरविले आहे. यानुसार आराखडे तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा पद्धतीनेच मुंबई बंदर परिसराचा विकास केला जाईल. बंदराशी संबंधित सेवांबरोबरच व्यापारी, औद्योगिकीकरण, निवासी क्षेत्र विकसित केले जाईल. हा विकास करताना मोकळ्या जागेत उद्याने, जागतिक दर्जाची मनोरंजन केंद्रे, हॉटेल्स विकसित केली जातील. मनोरंजन केंद्रांबरोबरच आधुनिक पद्धतीने उद्याने तयार करण्याची योजना आहे. ही सारी कामे टप्प्याटप्यात पूर्ण केली जातील.
राज्य सरकारच्या वतीने मुंबईच्या विकासाकरिता विविध उपाय योजण्यात येत आहेत. त्याच्याशी सुसंगत असाच विकास बंदर परिसराचा केला जाईल. मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याकरिता पूर्व द्रुतगती मार्गाकरिता मुंबई पोर्ट ट्रस्टने आधीच जागा दिली आहे. नव्या फ्री वेमुळे मुंबईकरांचा प्रवास बराचसा सुसह्य़ झाला आहे. मुंबईत रोजगारवाढीला पोषक वातावरण आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाचा नियोजनबद्ध विकास झाल्याने मोठय़ा प्रमाणावर सेवा उद्योग, वित्तीय केंद्रे सुरू झाली. मुंबई बंदराच्या आसपासच्या परिसराच्या जागेचा विकास करताना दुसरे वांद्रे-कुर्ला संकुल मुंबई बंदराच्या जागेत विकसित करण्याची योजना आहे. मुंबई बंदराची जागा दक्षिण मुंबईत मोक्याच्या जागेवर आहे. वित्तीय केंद्र, सेवा उद्योग, माहिती तंत्रज्ञान याच्याशी संबंधित उद्योग या जागेत सुरू होऊ शकतात. मुंबईचे दुसरे वित्तीय केंद्र किंवा उद्योग संकुल या क्षेत्रात उभे राहील. मुंबई उपनगरात एक तर शहरात दुसरे अशी दोन उद्योग संकुले सुरू होतील. दक्षिण मुंबईतील या संकुलामुळे रोजगारवाढीस चालनाच मिळेल. निवासी क्षेत्रापेक्षा व्यापारीकरणावर जादा भर दिला जाणार आहे. नवनवीन उद्योग सुरू व्हावेत, असा प्रयत्न राहणार आहे. मुंबई बंदर परिसरात मोठय़ा प्रमाणावर किनारपट्टी विकसित करण्याची योजना आहे. चार मरिन ड्राइव्हएवढी किनारपट्टी आकर्षक पद्धतीने विकसित केली जाईल. यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडेलच, पण जागतिक पातळीवर मुंबईच्या किनाऱ्याची नोंद होईल.
मुंबई बंदरात क्रूझ पर्यटन सुरू करण्यासाठी पोषक वातावरण आहे. क्रूझ पर्यटनामुळे मुंबईच्या पर्यटनवाढीला हातभार लागेल. देशाच्या अन्य भागांतून मुंबईत ये-जा करणे सोपे आहे. समुद्रातील पर्यटनाचे देशाच्या अन्य भागांतील नागरिकांना विशेष आकर्षण आहे. समुद्र पर्यटन सुरू केल्यास त्याचा नागरिकांना आनंद लुटता येऊ शकेल. परदेशातील मोठय़ा बोटी पर्यटनाकरिता मुंबईत नांगरण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. या उद्योगाला चालना देण्याकरिता सुमारे २०० कोटी खर्च करून जेट्टी विकसित केली जात आहे. तसेच अन्य पायाभूत सुविधा मुंबई बंदरात उपलब्ध आहेत. यंदाच्या हंगामात ‘जेंटिंग ड्रीम’ ही आशियातील सर्वात मोठी पर्यटन बोट अलीकडेच मुंबईत येऊन गेली. आणखी काही परदेशी बोटी मुंबईत या हंगामात येणार आहेत. क्रूझ पर्यटनाला चालना दिल्यास दरवर्षी मुंबई बंदरात १५० ते २०० जागतिक पातळीवरील मोठय़ा बोटी येऊ शकतात. त्यातून मुंबईतील समुद्र पर्यटन वाढीला हातभार लागेल. समुद्र पर्यटनाला चालना देण्याची मुंबई बंदरात क्षमता आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला जाणार आहे. समुद्र पर्यटनामुळे मुंबईच्या गतवैभवात निश्चितच भर पडेल. मुंबई बंदराची जागा वर्षांनुवर्षे पडून आहे अशी टीका केली जाते. पण या जागेचा योग्य पद्धतीने वापर करून विकास केला जाणार आहे. मुंबई बंदरात बोटींच्या दुरुस्तीचे केंद्र सुरू केले जाणार आहे. सध्या तसे केंद्र असले तरी मोठय़ा जागेत त्याची रचना केली जाईल. यामुळे परदेशातून बोटी मुंबई बंदरात दुरुस्तीकरिता येऊ शकतात. मुंबई बंदराची रचना लक्षात घेता विदेशातील बोटींना दुरुस्तीकरिता मुंबई सोयीस्कर ठरू शकेल. बोटीदुरुस्ती केंद्रामुळे रोजगाराची क्षमता वाढू शकेल. मुंबई बंदरातून होणारी निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईच्या विकासाला सुसंगत असाच मुंबई बंदराचा विकास केला जाणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांकडून अहवाल तयार केला जात आहे. मुंबईच्या विकासात मुंबई बंदर महत्त्वाची भूमिका बजावेल आणि मुंबई बंदर हा परिसर जागतिक दर्जाचा म्हणून विकसित होऊ शकेल.