मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून फक्त ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याच्या पर्यावरण प्रेमींनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) हवाई सुरक्षा शाखेने चौकशी सुरू केली आहे. विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा करून पर्यावरणप्रेमींनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी यांसारखे पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये असा नियम आहे. तसेच एअरड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या (एईएमसी) नियमावलीत विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये या नियमाचा समावेश आहे.असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून ३ किमी अंतरावरील उलवे परिसरातील सेक्टर १९ येथे प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री केली जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या बी. एन. कुमार यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली होती. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत हवाई सुरक्षा शाखेने चौकशी सुरू केली असून ही तक्रार डीजीसीए अंतर्गत एअर सेफ्टी संचालक ए एक्स जोसेफ यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, मांस विक्री केल्यामुळे या परिसरात कावळे, घार यांच्यासह सर्व प्रकारचे पक्षी आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच इतर पक्ष्यांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर येथे जानेवारी महिन्यात कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. यामुळे तालुक्यातील बर्ड फ्लू रोखण्यासाठी पक्षी मारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर चिरनेर येथील कुक्कुटपालकांना बाधित क्षेत्रातील मृत आजारी निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस, विष्ठा, अंडी असे सर्व महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन व्यवसायातील विविध प्रकारच्या साहित्याच्या वाहतुकीस ९ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर दहा किमी परिसर बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. तसेच स्वच्छता आणि इतर सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.