मुंबई : दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असला तरी जागा वाढूनही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. तीन फेऱ्या संपल्यानंतर केवळ २७ हजार ५०० प्रवेश झाले आहेत. तर तब्बल १६ हजार १५१ जागा रिक्त आहेत. संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया २३ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवी महाविद्यालय आणि तुकड्यांसंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाले नाहीत. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडली. पारंपरिक आणि काही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पहिले सत्र संपल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची सुरूवात झाली. ही फेरी १६ डिसेंबरपर्यंत सुरू होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे ६० टक्के जागांवर प्रवेश देण्यात आले. पदवी अभ्यासक्रमांसाठी तब्बल ५० हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यांत प्रवेशही घेतले. ६ डिसेंबरपासून तिसऱ्या प्रवेश फेरीची सुरुवात झाली. या फेरीला १६ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. तीन फेऱ्यांपर्यंत ४३ हजार ५५१ जागा रिक्त होत्या. त्यापैकी आतापर्यंत २७ हजार ५०० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आता संस्थास्तरावर १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होणार आहे. या फेरीसाठी १६ हजार १५१ जागा रिक्त आहेत.

हेही वाचा…Mumbai Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शैक्षणिक वर्ष कोलमडले

प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. फार्मसी अभ्यासक्रमाच्या इतर वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबर सत्र परीक्षांचे अनेक विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर झाले. परंतु अद्याप प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियाच अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यापीठांना आता या प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे.