मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने बेस्टने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. बेस्ट उपक्रमाने ३० बस मार्गांमध्ये बदल केले असून हे बदल १ जून २०२५ पासून लागू होतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. या नूतनीकरणात नवीन वातानुकूलित मार्ग सुरू करणे, विद्यमान सेवांचे मार्ग बदलणे, क्रमांक बदलणे आणि वाहतूक वेळापत्रकात बदल आदींचा समावेश आहे.

बेस्ट उपक्रमाने भाडे वाढ केल्यानंतर, वाहतूक सेवेत बदल केला आहे. सध्या बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील २,७०० बस आहेत. या बसगाड्यांमधून दररोज सरासरी ३० लाख प्रवासी प्रवास करतात. नवीन वाहतुकीत बदल केल्याने गर्दीच्या वेळी मेट्रो स्थानकांना, प्रमुख रेल्वे स्थानकांना आणि व्यावसायिक केंद्रांशी प्रभावीपणे जोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वेमधून प्रवास झाल्यानंतर तत्काळ बसमधून पुढे जाता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी विनावातानुकूलित बस धावत होत्या. तिथे नवीन वातानुकूलित बस सुरू केल्याने प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे.

बॅकबे बस आगार ते कुर्ला आगारापर्यंत चालणारा वातानुकूलित बस मार्ग क्रमांक ए-२५, १ जूनपासून राणी लक्ष्मीबाई चौक येथे संपेल. काळा चौकी आणि वरळी आगारादरम्यान चालणारा बस मार्ग क्रमांक ४४, वातानुकूलित सेवेत श्रेणी सुधारित करण्यात येईल आणि मार्ग क्रमांक ए-४४ म्हणून पुन्हा नियुक्त केला जाईल. त्याचप्रमाणे, वरळी आगार आणि वेसावे यारी रोडदरम्यान चालणाऱ्या बस मार्ग क्रमांक ५६ वर नवीन मार्ग क्रमांक ए-५६ अंतर्गत फक्त रविवारी वातानुकूलित बस असतील. तर नियमित बस सोमवार ते शनिवार सुरू राहतील. सध्या माहीम आणि मीरा रोड पूर्वेला जोडणारा बस मार्ग सी-७१, सेनापती बापट मार्ग, रहेजा हॉस्पिटल आणि बनवारी कंपाउंड मार्गे काला किल्ला बस आगारापर्यंत वाढवला जाईल. याव्यतिरिक्त, सध्या नेव्ही नगर आणि वांद्रे कॉलनी बस स्थानक (पूर्व) दरम्यान चालणारा बस मार्ग क्रमांक ११ लिमिटेड, भायखळा स्टेशन (पूर्व) आणि परळ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून लालबाग उड्डाणपुलावरून मार्ग बदलेल. ज्यामुळे जिजामाता उद्यान (राणी बाग), जयहिंद सिनेमा आणि लालबाग येथील थांबे रद्द होतील. सध्या प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि विहार सरोवर दरम्यान चालणारा बस मार्ग क्रमांक २५, मार्ग क्रमांक २९ असा बदलेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच सध्या सांताक्रूझ आगार ते गोराई आगारापर्यंत जाणारा बस मार्ग क्रमांक ७९ हा १ जूनपासून चारकोप येथे संपेल. मंत्रालयापासून चालणाऱ्या बस मार्ग क्रमांक ए-८९ ची सेवा १ जूनपासून सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल. सध्या आठवड्याच्या दिवशी कुलाबा बस स्थानक ते वरळी आगार आणि रविवारी कुलाबा आगार ते वरळी आगारापर्यंत जाणारा बस मार्ग क्रमांक १२४, आता संपूर्ण आठवडाभर कुलाबा बस स्थानक ते वरळी आगारापर्यंत धावेल. नेव्ही नगर आणि वरळी आगारादरम्यान चालणारा बस मार्ग क्रमांक १२५, १ जूनपासून वातानुकूलित सेवेत रूपांतरित केला जाईल आणि ए-१२५ म्हणून चालवण्यात येईल.