उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणात अटक निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं पत्र सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर आता सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्रात अनिल देशमुख आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एनआयए कोठडीत आपण सचिन वाझेंची भेट घेतल्याच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.

“…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावे”; चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला सुनावलं

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “वाझे हे महावसूली आघाडीचे किती प्रिय…महाराष्ट्राच्या विधानसभेत हिरेन प्रकरणाचा विषय निघाल्यानंतर वाझेंना निलंबित करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली. मग त्यावरुन मोठी रजा आणि मग पदावरुन दूर करण्यावर आलो. नऊ वेळा विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढं ते प्रेम वाझेंवर…एक मिनिट विधानसभेचा जाणं म्हणजे काही लाखो, करोडो रुपयांचं नुकसान…पूर्ण दिवस सदन चाललं नाही”.

“पण दुसऱ्या दिवशी गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. अनिल परब यांचं जे म्हणणं आहे की, एका मंत्र्याचं नाव येणार हे तुम्हाला कसं कळलं वैगेरे याची सुरुवात तिथे आहे. नऊ वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर काही तुम्ही केलं नाही इतके वाझे तुम्हाला प्रिय… त्या वाझेंवर तुमचा इतका अविश्वास की म्हणे माझी आणि वाझेंची भेट झाली. आता एनआयएच्या कोठडीत मी कुठे जाणार…मी गिरणी कामगाराचा मुलगा… गिरण भागात आमचं घऱ आणि मी एनआयए कोठडीत जाऊन सचिन वाझेंची भेट घेतली आणि त्याना परबांचं, पवारांचं नाव लिहा असं म्हटलं हे हास्यास्पद आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पुढील १५ दिवसांत सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल असा दावा त्यांनी केला. “पुढील १५ दिवसांत अजून दोन मंत्री राजीनामे देतील. मला नावं विचारु नका. कोणीतरी न्यायालयात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल,” असं ते म्हणाले आहेत.