लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये विशेष जलगदती न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवावे, तसेच त्यांच्यासाठी उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद केंद्र उभारावे, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.

अभिनेता सैफ आली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले असून त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिम मतदारसंघातील आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

भारताची सीमा ओलांडून आलेले बांगलादेशी नागरिक मुंबईत बेकायदेशीररित्या स्थायिक झाल्याबद्दल साटम यांनी पत्रात चिंता व्यक्त केली आहे. हे घुसखोर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. अलिकडचा सैफ अली खानवर झालेला हल्ला हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. साटम यांनी काही उपाययोजना सुचवल्या असून या उपाययोजना लागू केल्यास बांगलादेशी घुसखोरांमुळे होणारा धोका कमी होईल आणि मुंबई तसेच महाराष्ट्राचे सुरक्षितता आणि स्थैर्य वाढेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार साटम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत –

१) घुसखोर बांगलादेशी नागरिकांसाठी उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद केंद्र उभारावे.
२) प्रमुख शहरांमध्ये विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवावे आणि निकालानंतर घुसखोरांना त्वरित देशाबाहेर पाठवावे.
३) पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) अधिनियम, १९५०, आणि परदेशी नागरिक अधिनियम, १९४६ मध्ये सुधारणा करून घुसखोरीसाठी कठोर शिक्षा व दंडाचे व्यवस्थापन करावे.