शिवसेनेशी सुरु असलेली प्रदीर्घ चर्चा निष्फळ ठरली असती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पमतातील सरकारला धोका होता.  काही मुद्दय़ांवर शिवसेनेला तडजोड करण्यास भाग पाडत आणि मंत्रीपदांचा हट्ट पुरवीत भाजपने राजकीय लढाईत बाजी मारली. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकाही फेटाळल्या. त्यामुळे फडणवीस सरकार राजकीय व न्यायालयीन लढाईत तरले.शिवसेनेशी अखेरच्या टप्प्यातील चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पार पाडली.समझोत्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या गळी उतरविण्याचे कठीण काम त्यांना सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मंत्र्यांबरोबर पार पाडावे लागले. फडणवीस यांच्यासाठी गुरुवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. सरकारच्या अस्तित्वाच्या राजकीय लढाईत ते तरले. तर न्यायालयानेही विधिमंडळ कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत विश्वासदर्शक ठरावाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या.