मुंबई: निवडणुकांमध्ये जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. या पुढील निवडणुकांमध्येही जनतेचे आघाडीलाच समर्थन मिळेल, असा विश्वास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेत ८५ जागांपैकी ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ जागा आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीतील निकालाने काँग्रेसला संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनेच चोख उत्तर दिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला चढविला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सहा जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत जनतेने भाजपलाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून विजयी केले असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये २५ टक्के जागा भाजपला, २५ टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. तर उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये आघाडीतील तिन्ही पक्ष सामावले आहेत. भाजपचा जनाधार वाढत आहे आणि इतरांचा कमीहोत आहे असा दावा भाजपने केला आहे.