मुंबई : महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे, असे परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी व्यक्त केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांना नेस्तनाबूत करा की दुर्बिणीतून ते दृष्टीस पडता कामा नयेत, असा मंत्र शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज्यात भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाही, हे शहांचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होते का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण २०२९ ला राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे विधान गेल्या वर्षी अमित शहा यांनी केले होते. शहा यांच्या विधानाची प्रतिक्रिया उमटताच सहकारी किंवा मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नव्हेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भाजपच्या चर्चगेट येथील कार्यालयाचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार या वेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता मिळवून ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आले पाहिजे, असे शहा यांनी स्पष्ट केले. भाजपने नेहमीच नीतीच्या आधारे राजकारणात कार्य करून देशातील नागरिकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला. राज्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकाचा मजबूत पक्ष बनला आहे, असे सांगून शहा म्हणाले, जनसंघानंतर भाजपची स्थापना झाली आणि तेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘अंधेरा छटेगा, कमल खिलेगा..’ असे उद्गार काढले होते. पक्षाच्या वाटचालीत वाजपेयी हे पुढे पंतप्रधान झाले आणि गेली ११ वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. ही पक्षासाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रातही फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रालोआ तिसऱ्यांदा सत्तेवर आली आहे.
घराणेशाहीवर पक्ष चालत नाही
भाजप घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही, येथे एक चहावालाही पंतप्रधान होतो. पक्षासाठी समर्पण, तळमळ व नेतृत्वगुण यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदापर्यंत पोचू शकले आहेत. मीही पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता व निवडणूक केंद्र किंवा बूथ प्रमुख होतो. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मी पोचू शकलो. केवळ नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेच्या जोरावर पक्षात महत्त्वाच्या पदांवर पोचता येते आणि भाजप असा एकमेव पक्ष आहे, असे शहा यांनी नमूद केले.
कार्यालयाचे स्वरूप
चर्चगेट येथील वासानी चेंबरच्या जागेत बांधण्यात येणाऱ्या भाजपच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम क्षेत्रफळ सध्या सुमारे ५५ हजार चौ.फूट इतके असेल. सध्या दहा मजली इमारत उभारली जाणार असून उपलब्ध असलेला संपूर्ण चटईक्षेत्र निर्देशांक तूर्तास वापरण्यात येणार नाही. ही इमारत केंद्रीय कार्यालयाच्या धर्तीवर उभारण्यात येणार असून विख्यात वास्तुविशारद हाफीज काँट्रॅक्टर यांनी त्याचे डिझाइन केले आहे. सुमारे ४०० जणांची बसण्याची सोय असलेले सभागृह, ग्रंथालय, बैठका व परिषदांचे कक्ष यांसह अनेक सुविधा उपलब्ध असतील. हे कार्यालय दोन ते अडीच वर्षांत उभारले जाणार आहे.
