मुंबई : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना आगामी शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पहिल्या इयत्तेला अभ्यासक्रम लागू होईल व पुढील शैक्षणिक वर्षापासून तो दुसरी, तिसरी व चौथीसाठी लागू केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी केली.

राज्य मंडळाच्या शाळांना कधीपासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू करायचा, हा वादाचा मुद्दा आहे. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य मंडळाच्या तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाचा आराखडा लागू करण्याबाबत सुकाणू समितीने मान्यता दिल्याचे अंशत: खरे असल्याचे भुसे म्हणाले. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर आता यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गापासूनच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तसेच राज्यातील सर्व शाळांना तो बंधनकारक असल्याचे भुसे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून राज्य मंडळाच्या शाळांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी विचारविनिमय सुरू आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री