मुंबई : वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्र व राज्याची परवानगी मिळाली आहे. आता या प्रकल्पासाठी केवळ वनखात्याची कांदळवनासाठीची परवानगी शिल्लक आहे. या सर्व परवानग्या येत्या दीड महिन्यात मिळतील व त्यानंतर लगेच वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

शहर भागातील सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून या प्रकल्पाच्या उत्तर मुंबईतील भागावर आता पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. वर्सोवा – दहिसरदरम्यानच्या या प्रकल्पासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. मात्र परवानग्यांमुळे या प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मात्र लवकरच या परवानग्या मिळतील व काम सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी, उत्तर मुंबईत ४० नगरसेवक निवडून आणणार, पियुष गोयल यांचा निर्धार

गोयल यांनी उत्तर मुंबईतील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. उत्तर मुंबईतील विकास योजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. मालाडमध्ये बस स्थानक बांधणे, गोराई व चारकोप येथील पाण्याची समस्या सोडविणे, मालाड (पू) येथे क्रीडा संकुल, चारकोपमध्ये नाट्यगृह व समाज मंदिर उभारणे, मालवणी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाकाली मार्ग ते शाहीद अब्दुल हमीद मार्गाचे काम, कांदिवली (प) येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन व परशुराम थीम पार्क इत्यादी विषयांवरही प्रकाश टाकण्यात आला. तसेच एसआरए प्रकल्पाअंतर्गत चारकोप व बोरिवली येथील पुनर्वसनाचा मुद्दा आणि कांदिवलीमध्ये १५ हजार रहिवाशांना सांडपाण्याचा प्रश्न याविषयी सकारात्मक चर्चा झाली.

हेही वाचा…मुंबईकर घामाघूम

भगवती रुग्णालयात मे महिन्यात रुग्णांच्या सेवेत

भगवती, शताब्दी व सावित्रीबाई या रुग्णालयांतील अपुरी साधनसामग्री व मनुष्यबळ वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच भगवती रुग्णालय मे महिन्यापर्यंत रुग्णांच्या सेवेत दाखल होईल. प्रत्येक रुग्णालयात आयुष्यमान योजनेतून रुग्णांना सेवा पुरवली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मीठ चौकी पूल १४ जानेवारीपासून

मालाड पश्चिमेकडील मीठ चौकी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून १४ जानेवारी रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन होईल व हा उड्डाणपूर्ण सर्वांसाठी खुला होईल, अशीही माहिती यावेळी गोयल यांनी दिली.

नि:क्षारीकरण प्रकल्पाला गती देणार

समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी पालिकेने आखलेल्या नि:क्षारीकरण प्रकल्पाला गती देणार असल्याची घोषणा गोयल यांनी यावेळी केली. मालाडमधील मनोरी येथे हा प्रकल्प उभारणार आहे. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रकल्प सध्या पालिका प्रशासनाने गुंडाळला आहे. नव्याने निविदा काढण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी निवडणुकांमुळे हा विषय बाजूला पडला आहे. मात्र गोयल यांच्या या घोषणेमुळे सदर प्रकल्पाला जणू हिरवा कंदिल मिळाला आहे. शनिवारच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला गती देण्याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्याची माहिती गोयल यांनी दिली.

हेही वाचा…कुर्ला उन्नत हार्बर मार्गाचे स्वप्न आणखी एक वर्ष लांबणीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व परवानग्या येत्या दीड महिन्यात मिळतील व त्यानंतर लगेच वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्र व राज्याची परवानगी मिळाली आहे. उत्तर मुंबईतील विकास योजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.