मुंबई : विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. नियमित तिकीट तपासणीसह आता विशेष तिकीट तपासणी केली जात आहे. नुकतीच दादर रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी करण्यात आली तर, मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी (फोर्ट्रेस चेक) करण्यात आली. त्यात एकूण १,३०९ विनातिकीट प्रवाशांना पकडले असून ४,१९,२३५ रुपये दंड वसूली केली. द्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> पाणी पुरवठ्यासाठी जलबोगद्यातून समांतर यंत्रणा उभारणार; पाणी गळतीच्या वेळी पाणी पुरवठा ठप्प होऊ नये म्हणून उपाययोजना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळानंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली असताना, विनातिकीट प्रवाशांचा प्रवास अधिक होत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या संख्येवर आणि त्यावरील महसुलावर परिणाम होत होता. परिणामी, मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. सीएसएमटीनंतर सर्वाधिक गर्दीच्या स्थानकामध्ये ठाणे स्थानक आहे. ट्रान्स हार्बर, मुख्य मार्ग यावरून लाखोंच्या संख्येने प्रवाशांचा प्रवास होतो. त्यामुळे ठाणे स्थानकाची ओळख गर्दीचे स्थानक म्हणून आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची संख्याही अधिक असल्याने त्यांना अटकाव घालण्यासाठी मंगळवारी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. ठाणे स्थानकातील पादचारी पूल, फलाट व इतर ठिकाणी ५८ तिकीट तपासणीस, १२ आरपीएफ जवान तैनात केले. या पथकाकडून द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणारे विनातिकीट प्रवासी सर्वाधिक पकडण्यात आले. पथकातील प्रत्येक तिकीट तपासणीसाने २३ हून अधिक जणांना पकडून प्रत्येकी ७,४८६ रुपयांची दंडवसुली केली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.