पात्रता निकष पायदळी तुडवून उभारण्यात आलेल्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या नवी मुंबईतील वादग्रस्त महाविद्यालयाचा विषय विधानसभेच्या उन्हाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. रवींद्र वायकर, चिमणराव पाटील आदी आमदारांनी या महाविद्यालयातील गैरसोयींसंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारला असून संबंधित महाविद्यालयावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत विचारणा केली आहे. टोपे यांच्या महाविद्यालयासह शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या वाडय़ातील महाविद्यालयामध्येही पात्रता निकष पायदळी तुडविल्याचे स्पष्ट झाले आहे. टोपे यांचे महाविद्यालय २००७-०८पासून एका निवासी इमारतीत चालविण्यात येत आहे, तर दरोडा यांचे महाविद्यालय अवघ्या तीन खोल्यांमध्ये थाटण्यात आले आहे. या दोन्ही महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वानवा तर आहेच, पण पिण्याचे पाणी, ग्रंथालय, वर्गखोल्या, खेळाचे मैदान, संगणक आदी अनेक मुलभूत सुविधांचीही सोय नाही. किमान पात्रता निकषांची पूर्तता केली नसताना या महाविद्यालयांना मान्यता कशी मिळाली, असा प्रश्न आहे. या दोन्ही महाविद्यालयांची उदाहरणे पुरेशी प्रातिनिधिक आहेत. गेल्या दोन वर्षांत राज्यात अशा प्रकारे निकष डावलून अनेक कला, वाणिज्य, विज्ञान व तत्सम व्यावसायिक महाविद्यालयांना उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिली गेली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे, या सर्व महाविद्यालयांना परवानगी देताना सर्व निकष तपासले की नाही हे पाहण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत टोपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे (मनविसे) गजानन काळे यांनी केली आहे. तर या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनविसेचे संतोष गांगुर्डे यांनी दिली.