मुंबई : बांधकाम घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेले वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी यूटर्न घेतला आहे. या भ्रष्टाचाराचा माझा काही संबंध नाही, बांधकामामागे पैसे नगररचना विभागाने घेतले असे सांगत त्यांनी अंग झटकले आहे. पवार यांच्या वकिलांनी न्यायालयात ही माहिती दिली. पवार सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या वकिलांनी या गुन्ह्यालाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

नालासोपारा मधील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात ईडीने वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, पालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यासह दोन भूमाफियांना १३ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. हे चारही आरोपी सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. ईडीने केलेल्या अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकाच्या घरात दिड कोटी रुपये सापडले होते. पवार यांच्या पत्नी अनेक कंपन्यात संचालक होत्या आणि भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा या कंपन्यांमध्ये पांढरा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

‘तो मी नव्हेच…’

अनिलकुमार पवार यांचे वकील उज्ज्वल कुमार चव्हाण न्यायालयात बाजू मांडताना पवार यांना या प्रकरणात जबरदस्तीने गोवल्याचा आरोप केला आहे. वकील चव्हाण यांनी सांगितले की, ईडीचे प्रकरण जबरदस्तीने घेतलेल्या जबाबांवर आधारित आहे. अनेकांना अटक करण्याची धमकी देऊन पवारांविरुद्ध जबाब द्यायला भाग पाडण्यात आले. शिवाय पवार यांच्या घरातून कोणतीही रोकड, दागदागिने किंवा सोन्याचा साठा जप्त करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

४१ इमारती २००८ ते २०२१ या काळात बांंधल्या आहेत. मी २०२२ मध्ये आयुक्त झालो. माझा काही संबंध नसल्याचे पवार यांनी वकिलामार्फत सांगितले. बांधकामामागे प्रति चौरस फुट पैसे मला नाही तर नगररचना खात्याला मिळत होते असे सांगून पवार यांनी आपले अंग या प्रकरणापासून झटकले आहे. नाशिकमधील बिल्डर जनार्दन पवार (अनिल पवार यांचा पुतण्या) यांच्या घरी जप्त करण्यात आलेल्या १ कोटी ३३ लाख रुपये रकमेशी पवारांचा काहीही संबंध नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. जनार्दन हे स्वतंत्र बांधकाम व्यावसायिक असून नियमितपणे आयकर भरतात, असेही त्यांनी सांगितले.

बायकोच्या नावाने कंपनी, मात्र कायदेशीर

अनिल कुमार पवार यांच्या पत्नी भारती पवार या अनेक नातेवाईकांच्या कंपन्यांमध्ये भांडवल गुंतवणूकदार होत्या. मात्र कंपन्या १९९७ ते २०१९ दरम्यान स्थापन झालेल्या आहेत, असा दावाही पवार यांच्या वकिलांनी केला. पवार आयुक्त होण्याआधीपासून या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या करपात्र, लेखापरीक्षित आणि कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या आहेत असे वकिलांनी सांगितले.

भारती पवार या जनार्दन ॲग्री, बीएसआर रिअल्टी, जे ए पवार बिल्डर्स आणि श्रुतिका एंटरप्रायझेस (अनिल कुमार पवार यांच्या मुलीची फर्म) या कंपन्यांमध्ये संचालक राहिल्या आहेत. त्यामुळे या कंपन्या लाचखोरीचे पैसे पांढरे करण्यासाठी निर्माण झाल्या असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. पवार जामीन मागण्याचा पर्याय न निवडता त्यांच्या अटकेच्या कायदेशीरतेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पवार यांच्या वकिलांनी दिली.