मुंबई : निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि मोकळ्या वातावरणात तसेच निष्पक्षपातीपणे होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या झालेल्या घोळाचा ही समिती सर्वात आधी आढावा घेणार आहे.

पक्षाने निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ईगल’ हा कृती गट स्थापन केला आहे. निवडणूक आयोगाकडून मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडल्या जातात की नाही यावर हा कृती गट लक्ष ठेवणार आहे. या कृती दलात अजय माकन, दिग्विजय सिंग, अभिषेक मनू संघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिंग सप्पल, नितीन राऊत, चल्ला वनसी चांद रेड्डी या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारयाद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची समिती चौकशी करणार आहे. या समितीत राज्यातील नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मतदारांची संख्या वाढली कशी?’ राज्यात २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात नव्याने ३२ लाख मतदारांची नोंदणी झाली होती. पण लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ४८ लाख मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काँग्रेसने हाती घेतला आहे. अवघ्या सहा महिन्यांत ४८ लाख मतदारांची संख्या कशी वाढली, असा सवाल काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्रातील या घोळाची माहिती घेण्याबरोबरच भविष्यातील निवडणूक प्रक्रियेवरही या कृती गटाचे लक्ष राहील.