मुंबई : विधान परिषदेसाठी काँग्रेसने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मुंबई कार्यक्षेत्र असलेले जगताप व हंडोरे यांची निवड केल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर दोन जागांवरही सामाजिक समतोल साधण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला दोन जागा येत आहेत.
विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता एक उमेदवार हमखास निवडून येऊ शकतो, परंतु दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने मतांची जमवाजमव करावी लागणार आहे. या दृष्टीने भाई जगताप यांना दुसरी उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप यांच्यावर मतांचे गणित जुळविण्याची जबाबदारी असेल.
जगताप व हंडोरे या दोन्ही नेत्यांचे मुंबई हे राजकीय कार्यक्षेत्र आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तर हंडोरे हे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. चेंबूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा हंडोरे निवडून आले होते. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांचा तत्कालीन मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. १९९२-९३ मध्ये ते मुंबईचे महापौरही होते.
विधान परिषदेत शरद रणपिसे हा काँग्रेसचा दलित चेहरा होता. त्यांच्या निधनानंतर वरिष्ठ सभागृहात काँग्रेसचा दलित समाजाचा प्रतिनिधी नव्हता. हंडोरे यांना उमेदवारी देऊन ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.
पक्षापुढे आव्हान
विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६.१० मतांची आवश्यकता असेल. काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. पहिल्या उमेदवाराला अधिकची मते दिल्यावर पक्षाकडे १५ अतिरिक्त मते आहेत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे अतिरिक्त मते नाहीत. यामुळे पक्षाला अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या २९ मतांमधून अतिरिक्त मतांची व्यवस्था करावी लागेल. त्यातच गुप्त मतदान पद्धतीने मतदान असल्याने मतांच्या फाटाफुटीची भीती आहेच.