मुंबई : भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जनतेपेक्षा ‘अदानी’च्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच ‘अदानी’ला दिले आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली कचराभूमी आणि सरकारी जागाही अदानीला दिली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत आणि विधानभवन ‘अदानी’ला देण्याचे बाकी असून ते कधी देणार, असा संतप्त सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला केला. तसेच धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी अदानीला कुर्ल्याची जागा देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांना घरे देण्यासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा हस्तांतरित करताना करारनाम्यातील अटी-शर्तीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर सपकाळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना जोरदार टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात अवकाळी आणि वळिवाच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला मदत करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहीण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत. शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत. परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजप युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? असा सवाल सपकाळ यांनी केला. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.