मुंबई: ‘मोदी यांना मी मारू शकतो’, असे धक्कादायक विधान केल्याने अडचणीत सापडलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेले वर्षभर विविध विधानांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी कानउघाडणी करूनही पटोले यांच्यावर परिणाम झालेला दिसत नाही. नाना पटोले यांची काही वादग्रस्त विधाने ’ ‘या आधी पण आम्हाला ठेच बसली होती. २०१४ मध्ये आमचा विश्वासघात केला गेला,’ (२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी तोडल्याचा संदर्भ देत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका.) ’ ‘राज्यातील सर्व मतदारसंघांत कार्यकर्ते व जनाधार असलेला काँग्रेस हा राज्यातील एकमेव पक्ष आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतो.’ ’ ‘२०२४ मध्ये राज्यात काँग्रेसचे स्वबळावर सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल.’ ’ ‘यूपीएच्या अध्यक्षपदी कोण असावे याबाबत संजय राऊत यांनी सांगू नये. शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही.’ ’ ‘प्रदेशाध्यक्ष या नात्याने काँग्रेसला राज्यातील पहिल्या क्रमांकावर नेणे हे माझे काम आहे. त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार. त्याने शरद पवार खूश होतात की नाराज होतात याने मला व माझ्या पक्षाला फरक पडत नाही.’ भाजप कार्यकर्त्यांकडून १०० हून अधिक ठिकाणी तक्रारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी १०० हून अधिक ठिकाणी तक्रारी (एफआयआर) दाखल केल्या आहेत, असे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सांगितले. पटोले यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने केली. पटोले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पटोले यांच्याविरोधात कारवाई होईपर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहील, असे भांडारी यांनी स्पष्ट केले. पटोले यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू केले व सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.