मुंबई : मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यातील १२.४ कोटी लोकसंख्येपैकी ७३ लाख म्हणजेच ५.८ टक्के नागरिकांना करोनाची लागण झाल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आलेख खाली येण्यास सुरुवात झाली आहे आणि १९ जानेवारीला नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात उपचाराधीन रुग्णांचा दर १०.१० टक्के असल्याचा दावाही सरकारने केला आहे. १९ जानेवारीपर्यंत राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४,७०८ असून ६९,१५,४०७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहे. करोनातून मुक्त होणाऱ्यांचा सध्याचा दर ९४ टक्के, तर मृत्यूदर १.९३ टक्के असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राज्यातील २,०७४ नागरिकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. ओमायक्रॉनचे सध्या राज्यात २१४ रुग्ण आहेत. गेल्या दोन वर्षांत राज्यात करोनामुळे १.४ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.