मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर २४ जानेवारीपासून मुंबईतील विविध माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असून या सर्व शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला असून शहराईतील सर्व शाळांना हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थी अजूनही प्रत्यक्ष शाळेत हजर राहत नाहीत. त्यामुळे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर २४ जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. जे पालक मुलांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकरीता दृकश्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवण्याचेही आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या साडेसहा लाख आहे. मात्र बहुतांशी पालकांनी फेब्रुवारीतही संमतीपत्र दिले नव्हते. तर काही ठिकाणी संमतीपत्र देऊनही विद्यार्थी हजर राहत नाहीत. त्यातच एका बाजूला दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घ्याव्यात की अप्रत्यक्ष यावरून वाद सुरू असताना आता पहिली ते आठवीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेतल्या जाणार आहेत. दोन वर्षांनी परीक्षा प्रत्यक्ष होणार आहेत. जे विद्याथ्र्यी ऑनलाईन उपस्थित राहात आहेत त्यांची परीक्षा फक्त ऑनलाईन पध्दतीने होईल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, याबाबत शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या जे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत, त्यांचे मूल्यमापन प्रत्यक्ष केले जावे व जे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहतात त्यांचे मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नववीबाबत निर्णय नाही..
नववीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. नववीच्या परीक्षा साधारणत: एप्रिलमध्ये होतात. त्यामुळे अजून महिन्याभराचा अवधी आहे. महिन्याभरात निरीक्षण करून याबाबत निर्णय घेऊ असे पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.