मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण आणि कल्याण ते मुंब्रा या रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री हाती घेतलेल्या एसी-डीसी परिवर्तनाच्या कामाचा प्रचंड ताप प्रवाशांना झाला. मध्य रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शनिवारी रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रात्री १२ वाजून १४ मिनिटांनी सुटणारी कसारा लोकल शनिवारी रात्री नेहमीची उपनगरी गाडी नव्हती तर लांब पल्ल्याच्या गाडीला पुढे आणि मागे इंजिन लावून ती विशेष कसारा लोकल म्हणून चालविण्यात आली. रात्री साडेबाराला सुटलेली ही गाडी डोंबिवलीला तब्बल (एक तास उशीरा) सव्वादोन तासांनी पोहोचली.
लांब पल्ल्याची गाडी आणि त्यात जेमतेम नऊ डबे त्यामुळे सीएसटीलाच ही गाडी पूर्णपणे भरली. सर्व स्थानकांवर ही गाडी थांबेल, असे इंडिकेटरवर दर्शविले असले तरी भायखळा रेल्वे स्थानकापर्यंत ही गाडी डाऊन जलद मार्गावरून काढल्याने मशीद आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर ती थांबलीच नाही. भायखळा स्थानकावरून ती डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येऊन पुढे सर्व स्थानकांवर थांबविण्यात आली.
अपवाद वगळता गाडीची योग्य उद्घोषणा होत नसल्याने अनेकांना ती कसारा लोकल आहे हेच कळत नव्हते. बऱ्याच प्रवाशांना ती लांब पल्ल्याची गाडी वाटत होती. मुळात लांब पल्ल्याची गाडी असल्याने गाडीचे दरवाजे अत्यंत छोटे असल्याने पुढील रेल्वेस्थानकावर उतरणारे आणि चढणारे या दोन्ही प्रवाशांची तुडंब गर्दी दरवाजावर होत होती. त्यामुळे काही जणांनी जीव मुठीत घेऊन दरवाजाला लोंबकळत प्रवासाचे दिव्य पार पाडावे लागल़े
प्रवाशांचे काही प्रश्न
*काही वर्षांपूर्वी मोटारमनच्या संपाच्या वेळी उपनगरी गाडीलाच पुढेमागे इंजिन लावून लोकल चालविण्यात आल्या होत्या. शनिवारी तशीच लोकल का चालविली नाही?
*सीएसटीवरून १२-१४ ची कसारा आणि १२-३८ ची कर्जत लोकल सुटते. या लोकल त्याच वेळेस सोडून त्यांनी ठाणे, कल्याण स्थानके ओलांडल्यानंतर रेल्वेने हे ब्लॉक का घेतले नाहीत?