मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे तसेच त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत पोलिसांनी कपात केली आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या श्रेणीत बदल करण्यात आल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. बुधवारी दिवसभर याबाबत चर्चा रंगली असताना पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला आहे.

उद्धव ठाकरे यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यामध्ये बदल करून आता त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दिल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना यापूर्वी असलेली ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आली असून एस्कॉर्ट वाहने काढण्यात आली आहेत. रश्मी व तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याच वेळी ‘मातोश्री’ निवासस्थान असलेल्या कलानगरच्या प्रवेशद्वाराबाहेर बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून असलेला तपासणी नाका हटविण्यात आला असून आता केवळ ‘मातोश्री’बाहेर काही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

शिवसेनेचा वर्धापनदिन आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वर्षपूर्तीवेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर यथेच्छ टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता सुरक्षा व्यवस्था घटविल्यावरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांची सुरक्षा अलिकडेच वाढविण्यात आली होती.

दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांना झेड प्लस व आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या व्यतिरिक्त तैनात अतिरिक्त पोलिसांची कुमक मात्र कमी करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांनी ती पार पाडावी आणि सुरक्षा पुरवावी. अनिल परब आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)