Shivaji Maharaj Statue  : मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारांना तसेच नौदलाला तेथील सोसाट्याचा वारा आणि खाऱ्या हवेत लोखंड किती गंजते, याचे आकलन झाले नसावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. पुतळा कोसळल्याची घटना दु:खदायक असून त्यामुळे वेदना झाल्या. पण त्यावरून जे राजकारण सुरू आहे, ते अधिक वेदनादायी आहे. या घटनेमुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करीत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा पुतळा राज्य सरकारने उभारलेला नव्हता. तो नौदलाने चांगल्या हेतूने हा पुतळा उभारला होता. आम्ही नौदलाच्या मदतीने याही पेक्षा मोठा पुतळा पुन्हा उभारु. यावरुन कोणीही राजकारण करु नये, तो खुजेपणा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

मोदी जिथे हात लावतात, त्याची माती संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यांच्या हस्ते आयोध्यातील राम मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्या ठिकाणी पाणी गळती सुरू झाली आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. तेथेही पावसाळ्यात गळती सुरू झाली. ज्या पुलांचे त्यांनी उद्घाटन केले ते पूल उद्ध्वस्त झाले. अटल सेतूला तडे गेले. ज्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले तो पुतळा अखेर पडला. मोदी ज्या ठिकाणी हात लावतात. त्याची माती होते, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्हे दाखल करावेत नाना पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून ही महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त कंत्राटदार आणि अधिकारी नाही, तर राज्य व केंद्र सरकारवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केली.