मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांना दडपशाही मार्गाने संपविण्याचे प्रयत्न राज्य सरकारने केले असून राज्यात अशी परिस्थिती कधीच नव्हती. सरकारने विरोधकांशी संवादच संपविल्याने सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला असून आता संघर्षच करणार असल्याचे प्रतिपादन  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.

महाराष्ट्रात हनुमान चालीसाचे पठण केल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह प्रत्येक भाजप कार्यकर्ता हनुमान चालीसाचे पठण करेल, हिंमत असेल तर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून दाखवा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी मनसे व भाजपने केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यावर बहिष्कार घातल्याचे जाहीर करून पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदूधर्मीयांनी नवरात्री, गणेशोत्सवासह अन्य सण व कार्यक्रमांमध्ये याबाबतच्या अटी व निर्बंधांचे पालन केले आहे, तसे आता मुस्लीमधर्मीयांनीही करावे. मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यापुढे हनुमान चालीसाचे पठण करण्याचे जाहीर केल्याने देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो. माजी खासदार किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना पोलिसांनीच त्यांना पोलीस ठाण्याबाहेरील शिवसेना कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिले. सरकारच्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. जशास जसे उत्तर देण्याची भाजपची ताकद आहे. केरळ, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांनी हत्या केली होती. महाराष्ट्रात तर भाजपचे चांगलेच बळ आहे. त्यामुळे आता सरकारशी जोरदार संघर्ष केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यां आजींची रविवारी भेट घेतली. याचा उल्लेख फडणवीस यांनी केला. आजीबाईंनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे मुख्यमंत्र्यांनी काय केले, त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी किंवा एसटी कर्मचाऱ्याच्या  कुटुंबीयांची भेट का घेतली नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला.