मुंबई : राज्य सरकारच्या वतीने आणण्यात येणारी वाघनखे नेमकी कोणती आहेत, असा प्रश्न शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज्य शासनाच्या वतीने आणण्यात येणारी वाघनखे नेमकी कोणती आहेत,  शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आहेत की शिवकालीन आहेत, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच ही वाघनखे उसनवारीवर आणण्यात येणार हे खरे आहे का, असाही प्रश्न ठाकरे यांनी विचारला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. आदित्य ठाकरे यांचीही हीच परंपरा आहे, असे फडणवीस यांनी टोला लगावला. तसेच मंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबद्दल ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मी बालबुद्धीला उत्तर देत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

हेही वाचा >>> उत्सवांमधील उन्मादावर राज ठाकरे यांचे टीकास्त्र; बीभत्सपणा कमी करण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन

फडणवीस यांच्या टीकेनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘मला आदुबाळ म्हणून हिणवले जाते; पण हाच आदुबाळ शिंदे-फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडत आहे. नावात बाळ म्हणजे माझ्या आजोबांचे (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) नाव आहे, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

दुष्काळ, महागाईऐवजी वाघनखांना अवास्तव महत्त्व; खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

नागपूर : महाराष्ट्रासह देशासमोर बेरोजगारी, दुष्काळ व वाढती महागाई ही मोठी आव्हाने आहेत. मात्र, सरकार या प्रश्नांपेक्षा वाघनखांना अवास्तव महत्त्व देत आहे. इतिहासतज्ज्ञांनी वाघनखांबाबत मांडलेल्या भूमिकेवर सरकारने साधकबाधक चर्चा केली पाहिजे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे देशातील लहान मुलांनासुद्धा माहीत आहे. शरद पवार यांनी पक्ष बांधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनमधून तीन वर्षांसाठी  आणण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकार आणि लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अ‍ॅन्ड अल्बर्ट म्युझियम’ यांच्यात  सामंजस्य करार होणार आहे.

– सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री