मुंबई आणि परिसरात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा परिणाम मुंबईकडे येणाऱया आणि मुंबईतून बाहेर पडणाऱया लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱया डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान, दुपारनंतर ट्रॅकवरील पाणी काही प्रमाणात कमी झाल्याने मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यास सुरुवात केली असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून गीतांजली एक्स्प्रेस रवाना करण्यात आली आहे. त्याचबरोबर महानगरी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत आणण्यात आली आहे. ट्रॅकवरील पाणी आणि पावसाचे प्रमाण बघून लांब पल्ल्याच्या पुढील गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द या हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक तूर्त बंदच ठेवण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारासही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने त्याचबरोबर समुद्रात उंच लाटा उसळत असल्यामुळे ट्रॅकवर साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. त्यामुळे लोकल गाड्यांबरोबरच मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्याही वेगवेगळ्या स्थानकावर ठप्प झाल्या आहेत.
कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या १६ गाड्या अडकल्या आहेत. त्यामध्ये चेन्नई एक्स्प्रेस, भुवनेश्वर एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, गोंदिया एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. कल्याण ते अंबरनाथ या दरम्यान सहा गाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामध्ये सिंहगड एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
कसारा ते कल्याण या दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेस, पाटणा एक्स्प्रेस या गाड्या अडकल्या आहेत. पाणी साचल्याने कोकण रेल्वेच्याही चार गाड्या विविध स्थानकांवर अडकल्या आहेत.