लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: बिपरजॉय वादळामुळे दोन दिवसांपासून मुंबई शहरात सोसाट्याचा वारा सुटला असून सोमवारी दुपारी शीव उड्डाणपुलावर वाऱ्यामुळे दोन विजेचे खांब पुलावर कोसळले. परिणामी चेंबूरवरून दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबई शहराला धोका नाही. मात्र सोसाट्याचा वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच सोमवारी दुपारी एकच्या सुमारास शीव उड्डाणपुलावर अचानक दोन विजेचे खांब रस्त्यात कोसळले. यातील एक खांब दुचाकी चालकाच्या अंगावर कोसळल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली असून त्याला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा-डी.एल.एड प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज नोंदणी
चेंबूरवरून दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हे दोन्ही खांब पडल्याने या मार्गावर दुपारच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन खांब बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.