मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरक्षा यंत्रणांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. अशा वेळी अत्यंत संवेदनशील ठिकाण असलेल्या मंत्रालयातच बनावट कार पास घेऊन गाडी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस कारवाईच्या भूमिकेत असतानाच मंत्र्यांच्या परिचयाची ही गाडी असल्याचे समोर आले आणि प्रकरणावर पडदा पडला.

मंत्रालयात प्रवेश घेताना सर्वसामान्य व्यक्तींना अनेक तपासणी प्रक्रियांतून जावे लागते. मंत्रालयीन कर्मचारी आणि पत्रकारांना आपला चेहरा स्कॅन करूनच मंत्रालयात प्रवेश दिला जातो. मात्र मंत्री आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून ही प्रक्रियाच अनेकदा धाब्यावर बसवली जाते. मंत्रालयात आलेली ही गाडी वाहनताळावर उभी राहिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला गाडीवर लावण्यात आलेला मंत्रालयीन प्रवेश पास बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंत्रालयीन सुरक्षा यंत्रणा सावध झाली. संबंधित वाहनचालकाला जाब विचारून त्याच्यावर कारवाईची पुढील प्रक्रिया सुरू झाली. तेवढ्यात संबंधित वाहनचालकाने केलेल्या ‘फोनाफोनी’नंतर ही गाडी एका मंत्र्यांच्याच ताफ्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांना यावर शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि या तक्रारीची डायरीत नोंदही न करता प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

गाडीत हापूस आंब्याच्या पेट्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित वाहनात हापूस आंब्याच्या पेट्या होत्या. कोकणातील एका मंत्र्याकडून हे वाहन पाठविण्यात आले होते. त्या पेट्या संबंधित विभागात तसेच आमदारांना पोहोचविण्यातही आल्या. मात्र आंब्यासारख्या गोड विषय असला तरी मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय? असा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला. मंत्रालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना एक न्याय आणि मंत्री, आमदारांना दुसरा का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.