मुंबई : ‘कलावंताच्या आयुष्यात अपयश ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. अपयश आल्यावरच आपण कलाकृती करताना कुठे अपुरे पडलो, याचा शोध घेतला जातो, असे सांगताना कोणतीही कलाकृती ही जगण्याच्या विविधांगी अनुभवातून येत असते. मात्र, अशा अनुभवावर आधारित कलानिर्मितीपेक्षा ‘कलावंत’ या शब्दाभोवती असलेल्या वलयाचेच आकर्षण अधिक असते. त्यामुळे थोडे लिहिता आले की प्रत्येकजण कलावंत म्हणून वावरू लागतो,’ अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी साहित्यक्षेत्रातील विद्यमान स्थितीचे वर्णन केले.
मराठीच्या सांस्कृतिक संचितात भर घालणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या पहिल्यावहिल्या महोत्सवाचे उद्घाटन नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते गुरुवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या नेटक्या सोहळ्यात करण्यात आले. यावेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या बरोबर प्रसिद्ध लेखक आणि एलकुंचवारांच्या साहित्याचे अभ्यासक हिमांशू स्मार्त यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
लहानपणापासून झालेली जडणघडण आणि लिखाणातून होत गेलेली त्या विचारांची अभिव्यक्ती या संदर्भात बोलताना आपल्यावर कोणाचाही प्रभाव पडत नाही, कोणाचाही प्रभाव आपण स्वीकारत नाही. जिथे ज्ञान दिसते तिथे मात्र मन विनम्र होते. पण समोरची व्यक्ती ज्ञानी आहे की नाही हे मी माझ्या कसोटीवर घासून घेतो, असे एलकुंचवार म्हणाले.
कलेमध्ये जे जे अनावश्यक आहे ते असुंदरच असते, हे खरेतर लहानपणी वडिलांनी ज्या पद्धतीने वाढवले त्यातून मनावर संकर झाला होता. मात्र, नाटककार म्हणून लिखाण करताना विजयाबाई मेहता यांच्यासारख्या रंगकर्मीमुळे आपण कितीही सुंदर लिहित असलो तरी नाटकात त्याची गरज नसेल तर ते काढून टाकावे लागते.
तरच तुमचे नाटक बांधेसूद होते, हे अनुभवातून आकळत गेले, असेही त्यांनी सांगितले. नाट्यलेखन, सुसंस्कृत घरात गेलेले बालपण आणि घरापासून दूर शिक्षणासाठी आल्यानंतर मिळालेले अनुभव, नाट्यलेखन, आत्मकथनपर लेखन असे विविधांगी लेखन कसे होत गेले, त्यावेळची मानसिकता, भूमिका हे त्यांनी विस्तृतपणे सांगितले. मराठी साहित्याची आजची अवस्था, मध्यमवर्गीय मानसिकतेत अडकून पडलेले मराठी साहित्य, स्वतः भाषेचा अभ्यास न करता मराठी संपत चालली म्हणून ओरडणाऱ्या मराठी माणसाची दांभिकता, अध्यात्म म्हणजे काय, उपनिषदातून आलेले तत्त्वज्ञान अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा ऊहापोह एलकुंचवार यांनी केला.
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या उद्घाटनप्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन एलकुंचवार यांचे स्वागत केले. गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या महोत्सवामागची संकल्पना स्पष्ट केली. ‘गेले ७ ते ८ वर्षे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ हा उपक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण काही ना काही कारणामुळे ते पुढे जात राहिले.
आता या उपक्रमाला खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाला. आणि अभिजात मराठी साहित्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यासाठी महेश एलकुंचवार हेच अध्यक्ष म्हणून असायला हवेत, यामागेही निश्चित कारणे आहेत, कुबेर म्हणाले. बाजारपेठी गरजांनुसार लेखन न करणारा, कुठल्याही एका विचारधारेला बांधून न घेणारा आणि भारतीय परंपरेची अथांगता समजून घेऊन ते लिखाणात उतरवण्याची विद्वत्ता असलेला एलकुंचवार यांच्यासारख्या विचारवंताच्या हस्ते लिटफेस्टचे उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
८ नोव्हेंबरपर्यंत संस्कृतीचा गौरवोत्सव एलकुंचवार यांच्या विचाराने आणि त्यांच्या उपस्थितीने भारलेल्या वातावरणात लिटफेस्टची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पार्ल्यातील लोकमान्य सेवासंघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ रंगणार आहे. प्राचीन परंपरा आणि रसरशीत वर्तमान असलेल्या मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, शिल्प-चित्रकलेसारख्या विविध कलांमधील अभिजाततेचे दर्शन घडवणारे उपक्रम या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत.
