कोल्हापुरातील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; पोलीस ठाण्यात रवानगी

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबाव्यात, त्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी कोल्हापूर परिसरातील एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्या केलेल्या सुमारे २५ शेतकऱ्यांच्या अस्थी सोबत घेऊन त्यांची कलशयात्रा काढणारा हा शेतकरी शनिवारी मुंबईत डेरेदाखल झाला. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान सरकारचे कर्जमाफीकडे लक्ष वेधावे या उद्देशाने या शेतकऱ्याने हा अस्थिकलश आणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कलशाचे दर्शन घ्यावे, अशी त्याची इच्छा होती. मात्र, पोलिसांना त्याचा सुगावा लागताच शेतकऱ्याची रवानगी आधी पोलीस ठाण्यात व नंतर आझाद मैदानात झाली.

कोल्हापूर परिसरातील विजय जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले जावे, या इराद्याने ही अस्थिकलश यात्रा काढली आहे. कोल्हापूर येथून ते प्रथमत: नागपूरला गेले. तेथून शनिवारी ते मुंबईत दाखल झाले. आमदार निवासात शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या खोली क्रमांक ११० मध्ये जाधव यांनी मुक्काम ठोकला. रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा जाधव यांचा इरादा होता. मात्र, पोलिसांना त्यांच्या इराद्यांचा सुगावा लागताच रात्री दोन वाजता पोलीस आमदार निवासात पोहोचले. तेथून जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली. जाधव यांना मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांना रात्रभर ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी जाधव यांना आझाद मैदानात सोडून देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे हबकून गेलेल्या जाधव यांनी मुख्यमंत्री अस्थिकलशाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून आंदोलन करणाऱ्या जाधव यांना आझाद मैदानात कोण भेटायला येते, त्यांच्याशी कोण चर्चा करते यावर पोलिसांचे लक्ष होते. गृहराज्यमंत्री त्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाधव यांना पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच यावे असा त्यांचा आग्रह आहे.

दुष्काळ आणि कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे सरकारविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी एके काळी मागणी करणारे आताचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या अस्थिकलशाचा सन्मान राखायला हवा. विजय जाधव, आंदोलक शेतकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. जाधव यांच्या अटकेवरून विरोधकांबरोबरच शिवसेनेनेही सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले, तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांशी निदान संवेदनशीलपणे वागा, असे सरकारला सुनावले.