लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: वांद्रे पश्चिमेकडील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि आसपासच्या दहा – बारा झोपड्या आगीत भस्मसात झाल्या. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे पश्चिम येथील के. सी. मार्गावर लालमट्टी परिसरातील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे आग लागली. या झोपडपट्टीत दुमजली झोपड्या असून दहा – बारा झोपड्यांना आगीचा विळखा पडला होता. या आगीमध्ये विद्युत वाहिन्या, लाकडी सामान, कपडे आदी घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सकाळी ८ वाजता ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुख सय्यद (३०) आणि साहिल खान (१९) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.