लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई: मध्य रेल्वेवरील वाशिंद येथे तांत्रिक कामांसाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री २.०५ ते पहाटे ४.३५ दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कसाऱ्याहून सीएसएमटीसाठी सुटणारी पहिली लोकल ठाण्याहून चालवण्यात येईल. तर, सीएसएमटीहून कसाऱ्याला जाणारी शेवटी लोकल ठाण्यापर्यंत धावेल. परिणामी, कल्याण पुढील प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसेच, मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना तासभर एकाच ठिकाणी थांबावे लागणार आहे. आणखी वाचा- मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण वाशिंद ब्लॉकमुळे रात्री १२.१५ वाजता सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल. तर, पहाटे ३.५१ वाजता कसाराहून सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल. तसेच, अनेक मेल-एक्सप्रेस अंशिक रद्द करण्यात येतील. यामध्ये गोरखपूर ते एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस पहाटे ३.१० वाजेपासून ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत आसनगाव स्थानकात थांबवण्यात येईल. आदिलाबाद ते सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस पहाटे ३.४१ वाजेपासून ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत आठगाव येथे थांबवण्यात येईल. अमरावती ते सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस पहाटे ४.२२ वाजेपासून ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत खर्डी येथे थांबवण्यात येईल. गोंदिया ते सीएसएमटी विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.