डेहराडून एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचा तपास न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांकडे सोपविण्यात आला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना अद्यापही मिळू शकलेली नाही. तसेच आगीबाबतचे सर्व तर्कवितर्क चुकीचे असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी दिली.
एस १, एस २, एस ३, एस ४ या चार डब्यांना आग लागली होती. त्यापैकी एस ४ वगळता उर्वरित तीन्ही डबे आगीत भस्मसात झाले. ही आग शॉर्टसर्किट, धूम्रपान किंवा हुक्का, बॅटरीचा स्फोट या कारणांमुळे लागल्याचे तर्कवितर्क बुधवारी सुरू होते. मात्र यापैकी एकाही तर्काला रेल्वे अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली नव्हती. रेल्वे डब्यांच्या बॅटरीला ट्रॉली प्रॉप्लिनचे कवच असते. ही बॅटरी १६० अंश तापमानाला वितळतात. या बॅटरीमुळे आग लागली असती तर एवढय़ा भयंकर तापमानात सर्व डब्यांतील बॅटरी वितळल्या असत्या. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे ही आग बॅटरीच्या स्फोटाने लागलेली नाही, असे कुमार यांनी स्पष्ट केले.
रेल्वेला लागणाऱ्या आगीमध्ये सर्वसामानाची राख होते. तसेच आग विझविताना त्यावर पाणीही पडते. त्यामुळे आगीचे नेमके कारण शोधणे नेहमीच कठिण ठरते. त्यासाठी आता आम्ही कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांना पाचारण केले आहे. हे तज्ज्ञ डब्यांची तपासणी करुन त्यानंतर आगीचे कारण सांगू शकतील, असे कुमार म्हणाले.
मृतांच्या तपासणीसाठी डीएनए चाचणी
चार मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. हे चारही मृतदेह आगीत भस्मसात झाले आहेत. त्यामुळे त्यांची डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या यादीतील पाच प्रवाशांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. सकीना आरसिवाला (५७), जमीर अहमद (६०), हकीमुद्दीन (६३), झेबुन आरसिवाला (५३), शहानूप मोदी (६०) अशी त्यांची नावे आहेत.