मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग हे दोनदा लोकसभेवर निवडून गेले आणि राज्यमंत्रीही झाले. मात्र ती संधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांना लाभलेली नाही. गेल्या वेळी ते हरले. आता पुन्हा एकदा ते ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून बिजू जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात उभे राहिले आहेत.

पटनाईक हे २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २०१८ मध्ये ते बिजू जनता दलात सामील झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भुवनेश्वर येथून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र भाजपच्या अपराजिता सारंगी यांच्याकडून ते पराभूत झाले. आता ते पुरी येथून निवडणूक लढवत आहे. यंदा आपण निश्चितच विजयी होऊ असा विश्वास पटनाईक यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला. पराभूत झाल्यानंतरही आपण तेथील जनतेच्या संपर्कात आहोत. पुरी जिल्ह्यातील पिपलीशी आपला नजीकचा संबंध आहे. आपले आजोळ येथीलच आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठीच आपण निवडणूक लढवत आहोत, असेही पटनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ओडिशा माझे कुटुंब’ या योजनेची जबाबदारी आपल्यावर असून त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी संबंध येतो. पुरी जिल्ह्याशी मुख्यमंत्र्यांचे एक वेगळेच नाते असून त्याचा फायदा निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी ठोस धोरणाचा अभाव

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी समाजवादी पार्टीतून वायव्य मुंबईत निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना यश मिळाले नाही. नवी मुंबईचे माजी आयुक्त रामराव घाडगे यांनी अमरावतीतून निवडणूक लढविली. माजी पोलीस महानिरीक्षक तुकाराम चौधरी यांनीही निवडणूक लढविली होती. पण यांपैकी कोणालाही यश मिळाले नाही. माजी पोलीस अधिकाऱ्यांपैकी वाय. सी. पवार, प्रताप दिघावकर हेही इच्छुक होते. पण त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही. निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी सध्या आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत.

हेही वाचा…जे. जे. रुग्णालयात ४३ हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार, पहिल्या एआरटी केंद्राला २० वर्षे पूर्ण

राज्यातून अब्दूर रेहमान

राज्य मानवी हक्क आयोगाचे महानिरीक्षक अब्दूर रेहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन धुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली आहे. देशात भाजप सरकारने नागरिक सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केल्याच्या निषेधार्थ आपण भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. आपण दोन वर्षे धुळ्यात अधीक्षक होतो. त्यामुळे धुळेवासीयांशी आपले वेगळे नाते आहे. इतकी वर्षे होऊन धुळेवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकलेला नाही. दोन वेळा खासदार राहिलेले भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. महाविकास आघाडीने या ठिकाणी वंचितला पाठिंबा द्यावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे रेहमान यांचे म्हणणे आहे.