मुंबई : शिवसेना पक्षाची दोन शकले झाल्यापासून एकेक करीत सुमारे पन्नास टक्के माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. दुसरीकडे ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात बोलवली नसल्यामुळे ते देखील नाराज आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तयारीही प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीला उभे राहण्यास इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यातही गेली पंचवीस-तीस वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवलेल्या शिवसेनेत आता दोन गट पडल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षातून गेल्या दोन अडीच वर्षात सातत्याने नगरसेवक बाहेर पडत असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. २०१७ ते २०२२ या अलिकडच्या काळातील पन्नास टक्के नगरसेवक ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर ज्या भागात महाविकास आघाडीचे आमदार खासदार निवडून येऊ शकले नाहीत. त्या भागातील माजी नगरसेवकांना विकासनिधीच मिळत नसल्यामुळे तेथील माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत. नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी ठाकरेंकडून एकही बैठक घेतली जात नाही. तर दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाकडून मात्र पक्ष प्रवेशासाठी चुचकारले जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे ठाकरेंचे एकेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षाच्या गळाला लागत आहेत.
माजी नगरसेवकांना बैठकीला न बोलावण्याची मागणी
शिस्तबद्ध पक्ष म्हणून शिवसेनेची ख्याती असून या पक्षाच्या वेळोवेळी बैठका होतात. मात्र गेल्या जुलै महिन्यापासून ठाकरेंच्या पक्षाने माजी नगरसेवकांची एकही बैठक घेतलेली नाही. तसेच कोणत्याही माजी नगरसेवकांना बोलावलेले नाही. नगरसेवक बैठकीला येतात आणि दुसऱ्या दिवशी पक्षातून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना बैठकीला बोलवू नका, अशी तक्रार एका विभागप्रमुखाने केल्यामुळे नगरसेवकांना बैठकीला बोलवले जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या बैठका होतात पण माजी नगरसेवकांना बोलावले जात नसल्याबद्दल माजी नगरसेवक खंत व्यक्त करत आहेत. आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर तरी माजी नगरसेवकांची बैठक घेणार का? असाही प्रश्न माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
१०० पैकी फक्त ४८ उरले
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत एकसंघ शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. चार अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही संख्या ८८ झाली. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या ९४ झाली होती. त्यात जात पडताळणीमध्ये तसेच पोटनिवडणूकीमुळे शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. त्यामुळे प्रत्यक्षात मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे सुमारे शंभर नगरसेवक होते. त्यापैकी आता ठाकरेंबरोबर सुमारे ४८ नगरसेवक उरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ज्या माजी नगरसेवकांची पक्षावर निष्ठा आहे ते पक्षासोबत आहे. ज्यांना निवडून येण्याची खात्री नाही, जे द्विधा मनस्थितीत आहेत ते पक्ष सोडून जात आहेत. महापालिकेची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता नगरसेवकांच्या बैठका होत नाहीत.– सुनील प्रभू, आमदार, शिवसेना (ठाकरे)