मुंबई : गिरगाव चौपाटी बाहेरील परिसरात बेकायदा पार्किंगचे पैसे उकळणाऱ्या टोळीविरुद्ध गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तापस पटनाईक (४३) नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून गौतम कुमार सगल (२७), गौतम हरीश गिरी (२५), सुषांत सोनाथन दास (३१) आणि हेमंत सनातन दास (४५) हे पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अंधेरीतील रहिवासी असलेले अंकुर सचदेव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, ते १३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास अहमदाबादवरून आलेल्या मित्रासोबत मोटारगाडीने गिरगाव चौपाटी फिरण्यासाठी आले होते. येथील सुख सागरच्या सिग्नलजवळ मोटरगाडी उभी करताच एकाने चौपाटीच्यासमोर सार्वजनिक पार्कीग असल्याचे सांगितले. त्यानुसार, गिरगाव चौपाटीसमोर मोटरगाडी उभी केली. काही वेळाने मोटरगाडी जवळ येताच गावदेवी पोलीस तेथे दिसून आले. त्यांनी नो पार्किंगमध्ये मोटरगाडी उभी केल्यामुळे कारवाई करीत असल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला.
त्यांनी चार आरोपींकडे एका तासासाठी १०० रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच, वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होणार नाही अशी हमी या टोळीने दिली होती. तसेच या वाहनतळाचे मालक पटनाईक असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. या ठिकाणी पालिकेचे अधिकृत वाहनतळ नसल्याचे त्यांना पोलिसांकडून समजले. त्यावेळी आरोपी पार्किंगच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर तक्रारदाराने अन्य चालकांकडे चौकशी केली. तेव्हा, आरोपींनी त्यांच्याकडूनही महिन्याचे ४ हजार, तर काहीजणांकडून दोन हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. अन्य चालकांकडूनही तासाला १०० ते दीडशे रुपये घेतल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
या ठिकाणी सार्वजनिक वाहनतळाबाबत दरपत्रक लावले होते. त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारणी करून के. एम. मुन्शी मार्गावर बेकायदेशीर वाहनतळ सुरू केल्याचे लक्षात आले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या पावत्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. चौकशीअंती त्यांचे बेकायदेशीर वाहनतळ हटवून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गावदेवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.