मुंबई : जगभरात गत दीड वर्षांपासून तापमान वाढीचा कल आहे. २०२४ मध्ये जगाच्या पृष्ठभागाच्या तापमानात सरासरीच्या १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही वाढ पुढील पाच वर्षे कायम राहील आणि औद्योगिक पूर्व काळाच्या तुलनेत म्हणजेच सरासरीपेक्षा १.२ ते १.९ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होईल, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने वर्तविला आहे. त्यामुळे भविष्यातही तापमान वाढ आणि उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.
पुढील पाच वर्षे तापमान वाढीचा कल कायम राहील. पुढील पाच वर्षांपेकी एक वर्षे २०२४ मधील तापमानापेक्षा जास्त तापमान असेल. किमान एक वर्ष सरासरी तापमानापेक्षा १.५ अंश सेल्सिअने जास्त राहील. आर्टिक ध्रुवावरील तापमानातही वाढीचा अंदाज आहे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर पर्जन्यवृष्टी आणि तापमानात मोठे फरक दिसून येण्याची शक्यता आहे.ऐन थंडीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर ते मार्च, या काळात आर्टिकमधील तापमान सरासरीच्या म्हणजे १९९१ ते २०२० या काळातील सरासरी तापमानाच्या २.४ अंश सेल्सिअने जास्त राहाण्याचा अंदाज आहे. समुद्रातील बर्फामध्येही घट होण्याचा अंदाज आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या तापमानात वाढ झाल्यास समुद्री जलचरांवर त्याचे विपरीत परिणाम होतात.
१८५० ते १९०० या काळातील सरासरी तापमानाच्या तुलनेत पुढील पाच वर्षात तापमान १.२ ते १.९ अंश सेल्सिअने जास्त राहिल्यास, संभाव्य तापमान वाढ जगातील सजीव सृष्टीच्या दृष्टीने धोकादायक ठरेल. उष्णता, थंडीच्या लाटांसोबत अतिवृष्टी, दुष्काळ, बर्फ वितळणे, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होणे आदी संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. शिवाय या तापमान वाढीचा शाश्वत विकास, सामाजिक आणि आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
२०२४ ठरले होते आजवरचे उष्ण वर्षे
मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात २०२४ हे वर्ष १८५० – १९०० या काळातील सरासरी तापमानापेक्षा १.५ अंश सेल्सिअसने जास्त तापमान असलेले पहिले वर्ष ठरले होते. गत वर्षांत जगात पृष्ठभागाचे तापमान १८५० – १९०० च्या सरासरीपेक्षा १.५५ अंश सेल्सिअसने जास्त होते. २०२४ हे वर्षे १७५ वर्षांच्या हवामान निरीक्षण सर्वांत सर्वात उष्ण वर्ष ठरले होते.
हवामाच्या अचूक अंदाजाची गरज
जगाने नुकतेच आजवरचे सर्वात उष्ण वर्ष अनुभवले आहे. दुर्दैवाने पुढील पाच वर्षे यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तापमान वाढीचा अर्थव्यवस्था, सजीव सृष्टी, आपल्या परिसंस्थांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. हवामान विषयक संघटनांनी अंदाज अचूकपणे वर्तविल्यास संभाव्य धोक्याची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे मत जागतिक हवामान संघटनेचे उपमहासचिव को बॅरेट यांनी व्यक्त केले.