मुंबई : मनात शिकण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास वयाची साठी ओलांडल्यानंतरही दहावीची परीक्षा उत्तीर्ण होता येते, हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील ६८ वर्षांच्या इंदू सातपुते या आजींनी दाखवून दिले. सकाळी शेतीची कामे, दुपारी घरातील स्वयंपाक व इतर कामे, सायंकाळी शिकवणी वर्गाला हजेरी आणि पुन्हा रात्री घर येऊन अभ्यास असा दिनक्रम सांभाळून इंदू सातपुते यांनी दहावीच्या परीक्षेत ५१.०० टक्के गुण मिळवले. विशेष बाब म्हणजे इंदू सातपुते यांचा नातू धीरज बोरकर ७५.६० टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यामुळे आजी – नातूची ही जोडी अनेकांसाठी आदर्श बनली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील इंदू सातपुते यांना इयत्ता सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी घराजवळ शाळा नसल्याने शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. घरापासून शाळा दूरवर असल्यामुळे कुटुंबानेही इंदू यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत पाठविले नाही. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा विवाह झाला आणि सासरी आल्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना तारेवरची कसरतही करावी लागली. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र शिक्षणाची आणि काही तरी नवीन करण्याची आवड यामुळे त्यांनी वाचन व लेखन सुरू ठेवले, भजनात दंग झाल्या आणि हिंगणघाटमधील जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षपदी काम करून संघटनात्मक कौशल्यही प्राप्त केले.

अनेक चढ – उतार असलेला हा प्रवास सुरू असताना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेचा ‘सेकंड चान्स’ हा उपक्रम त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरला आणि त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन पुन्हा शाळेची वाट धरली. हिंगणघाटमधील जामनीतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भरणाऱ्या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या शिकवणी वर्गात सायंकाळी दोन ते तीन तास नित्यनेमाने हजेरी लावली. त्यानंतर रात्री घरी येऊन पुन्हा दोन ते तीन तास अभ्यास केला. इंदू सातपुते या सतत वाचन व लेखन करीत राहिल्या.

नातवाकडूनही विविध शंकांचे निरसन करून घेतले आणि नातवानेही आजीचा सराव करून घेतला. त्यानंतर आजी व नातवाने एकत्र अभ्यास करून मेहनत व जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यश मिळविले.

‘आयुष्यातील कोणत्याही परीक्षेला घाबरायचे नाही. मेहनत व जिद्दीच्या जोरावर संधीचे सोने करू शकतो. मी शिक्षणाची आवड आणि सरावाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळविले’, असे इंदु सातपुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

२ हजार ३१० महिलांनी ‘सेकंड चान्स’चे सोने केले

विविध कारणांमुळे अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात आणि त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा येऊ पाहणाऱ्या सर्व महिलांच्या स्वप्नांना बळ प्रथम एज्युकेशन फाउंडेशन देत आहे. या संस्थेने ‘सेकंड चान्स’ हा उपक्रम राबवून दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या शेकडो महिलांचा अभ्यास करून घेतला. त्यांच्यासाठी शिकवणीचे विशेष वर्ग घेतले. तसेच शाळेतील प्रवेशापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरेपर्यंत सर्व प्रक्रिया राबविण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संस्थेकडून जून ते मार्च असे दहा महिने सोमवार ते शनिवार दर दिवशी चार तास प्रत्यक्षरित्या शिकवणी वर्ग घेतले जातात. यामध्ये महिलांच्या मनातून दहावीच्या परीक्षेची भीती घालविण्यासाठी सुरुवातीचे ३ महिने वाचन व लेखन कौशल्य सुधारण्यासाठी व प्राथमिक ज्ञान देण्यासाठी पायाभूत अभ्यासक्रम आणि त्यानंतर ७ महिने पाठ्यपुस्तकावर आधारित मुख्य अभ्यासक्रम शिकविला जातो. या प्रकारेच इंदू सातपुते यांनी अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत ५१.०० टक्के गुण मिळवले. या उपक्रमाच्या माध्यमातून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीची २ हजार ४९३ महिलांनी परीक्षा दिली आणि २ हजार ३१० महिला उत्तीर्ण झाल्या. ९३ टक्के इतकी उत्तीर्णतेची टक्केवारी आहे.